नगर – शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या कापड बाजार, मोची गल्ली, गंजबाजार, घासगल्ली भागातील अतिक्रमणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने बुधवारी काढली. मागील काही दिवसांपासून अतिक्रमणांचा मुद्दा चर्चेत आहे. अतिक्रमणे काढली नाही तर आमरण उपोषणाचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला होता. तर या परिसरातील पथ विक्रेत्यांनीही महापालिकेत आंदोलन केले होते. त्यामुळे महापालिका प्रशासन काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले होते. अखेर अतिक्रमण विरोधी पथकाने पोलीस बंदोबस्तात येथील अतिक्रमणे काढली.
पथकाने बुधवारी सकाळी कापडबाजार, मोची गल्ली, सारडा गल्ली येथे अतिक्रमण हटाव मोहिम राबविली. प्रशासनाने अचानक कारवाई सुरू केल्याने अतिक्रमणधारकांची धावपळ उडाली. पथकाने हातगाड्या, टेबल तसेच अन्य साहित्य जप्त केले. रस्त्याच्या कडेला उभे केलेले व वाहतुकीस अडथळा ठरत असलेलेफलक हटविण्यात आले. या कारवाईमुळे बाजारपेठेतील रस्ते मोकळे झाल्याचे पाहण्यास मिळाले.
या ठिकाणच्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा होत होता. आता तर दिवाळीचा मोठा सण आहे. त्यामुळे बाजारपेठेत प्रचंड गर्दी होणार आहे. वाहनांच्या पार्किंगचाही प्रश्न आहे. अशा परिस्थितीत येथील अतिक्रमणे काढण्याची मागणी केली जात होती. याआधीही येथील अतिक्रमणे काढण्यात आली होती. मात्र, पुन्हा अतिक्रमणे झाली. आता पुन्हा मनपाने अतिक्रमणांवर कारवाई केली आहे. व्यापाऱ्यांनी अतिक्रमणे काढण्याचीही मागणी केली होती. त्यानंतर प्रशासनाने ही कारवाई केली आहे. बुधवारी बाजारपेठेतील बहुतांश दुकाने बंद असतात. त्यामुळे पथविक्रेतेही कमी असतात. त्यामुळे कारवाईसाठी प्रशासनाने हा दिवस निवडल्याचे सांगण्यात येत होते. या दिवशी पथकाने या परिसरातील अतिक्रमणे काढून घेतली.