सातारा शहराच्या हद्दवाढीच्या निर्णयाने त्रिशंकू भागाच्या विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे. हद्दवाढीनंतर पायाभूत विकासाचे आव्हान पालिकेला पेलणार का, घरपट्टी किती वाढणार, त्रिशंकू भागाची राजकीय रचना काय असणार असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात आहेत.
शहराच्या पंचवीस किलोमीटरच्या परिघात नव्या भागांसाठी आवश्यक असणारा विकास निधी आणि त्यासाठी हवी असणारी राजकीय इच्छाशक्ती यांचा समन्वय साधताना येथील व्यवस्थेने राजकारणाच्या पलिकडे पहायला हवे. हद्दवाढीनंतर नक्की विकासाची दिशा कशी असणार असा प्रश्न सर्वांसमोरच आहे…
सातारा -सातारा शहराचा चाळीस वर्षांपासून प्रलंबित असलेला हद्दवाढीचा प्रश्न मार्गी लागला असतानाच आता पालिका हद्दीत आलेल्या ग्रामपंचायतींच्या सर्व मिळकती व योजना नगरपालिकेत हस्तांतरीत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शासनाच्या नगर विकास विभागाने तसे आदेश काढले असून नव्याने नगरपालिकेत समाविष्ट होणाऱ्या जनतेच्या विकासाचा मार्ग सुकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शासनाच्या नगर विकास विभागाने हद्दवाढीचा प्रस्ताव दि. 8 सप्टेंबर रोजी मंजूर केला. त्यामुळे सातारा पालिकेत दरे, शाहूपुरी, विलासपूर या तिन्ही ग्रामपंचायती समाविष्ट होणार आहेत. तर खेड, दरे खुुर्द, कोडोली, गोडोली, संभाजीनगर या ग्रामपंचायतींचा काही भाग पालिका हद्दीत समाविष्ट होणार आहे.
या ग्रामपंचायतींच्या मिळकती व योजना ताब्यात घेण्याच्या हालचाली आता सुरू झाल्या आहेत. मिळकती ताब्यात घेतल्यानंतर या ग्रामपंचायतींच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळेल. पालिकेला राज्य व केंद्र शासनाच्या नवनवीन योजनांची
या ठिकाणी अंमलबजावणी करता येईल. अमृत, यूआयडीएसएसएमटी, घरकुल योजना, झोपडपट्टी पुनर्वसन, घनकचरा निर्मूलन, पाणीपुरवठा योजना, भुयारी गटार, रस्ते विकास, सार्वजनिक खुल्या जागांचा विकास, बागबगीचे सुधारणा, बालोद्यानांची निर्मिती, वृद्धांसाठी नाना- नानी पार्क, क्रीडांगण विकास, जलतरण तलावांची निर्मिती, शापिंग सेंटर, अद्ययावत भाजी मंडई, मच्छी मार्केट, एलईडी दिवे, चौकांचा विकास अशी अनेक विकास कामे टप्प्याटप्प्याने करता येतील. पालिकेच्या आस्थापनेवर 445 कर्मचारी आहेत. पैकी 23 टक्के कर्मचारी निवृत्त झाले असून नव्याने ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची सेवा पालिकेकडे वर्ग होणार आहे. त्यामुळे पालिकेच्या आस्थापनेत व्यापक बदल होणार असून नव्या आकृतीबंधाचे निर्देश नगरविकास विभागाकडून दिले जाणार आहेत .
… तर पालिकेबरोबरच गणांची निवडणूक
हद्दवाढीमुळे शाहूपुरी व गोडोली गटातील शाहूपुरी व गोडोली हे गण रद्द झाले आहेत. शिवाय शाहूपुरी, दरे खुुर्द व विलासपूर या ग्रामपंचायतीदेखील बरखास्त झाल्या आहेत. शासन नियमानुसार हद्दवाढ झाल्यानंतर संबंधित वाढीव क्षेत्राची सहा महिन्यांच्या कालावधीत निवडणूक घेणे क्रमप्राप्त आहे.
या तिन्ही ग्रामपंचायतीची लोकसंख्या लाखांच्या घरात आहे. सात ते साडेसात हजार लोकसंख्येमागे एक नगरसेवक या नियमानुसार पालिकेला नव्याने 12 ते 13 नगरसवेक मिळू शकतात. फेब्रुवारी- मार्च 2020 मध्ये ही निवडणूक लागली तरी पुढे सहा महिन्यांवर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक आहे.
त्यामुळे नव्याने निवडून येणाऱ्या नगरसेवकांना सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागेपर्यंत केवळ तीन ते चार महिन्यांचाच कालावधी मिळू शकतो. शिवाय करोनामुळेही निवडणूक कार्यक्रम अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे निवडणूक आयोग सर्वच निवडणुका एकत्रित घेण्यावर विचार करू शकतो.