– हिमांशू
“असे फोटो दर महिन्याला व्हायरल होत असतात… त्यात काय एवढं!’ एका रस्त्याच्या “बिफोर-आफ्टर’ फोटोकडे पाहून आमच्या एका मित्राची ही रुक्ष प्रतिक्रिया! सोशल मीडियानं आपल्याला किती बोथट करून टाकलंय, हे पुरेपूर जाणवलं. वास्तविक, तो फोटो पाहून मनात कालवाकालव होत होती. फोटोचे दोन भाग केलेले. डावीकडे एका रस्त्याचा पूर्वीचा फोटो. दोन्ही बाजूंना गर्द झाडी, रस्त्याकडेला पडलेला गुलमोहराच्या फुलांचा सडा असं दृश्य. या रस्त्याचं आता रुंदीकरण आणि कॉंक्रिटीकरण झालंय. दोन्ही बाजूंना आता एकही झाड दिसत नाहीये.
ते भकास दृश्य उजव्या फ्रेममध्ये! पण रस्त्याच्या रुंदीकरणामुळे संबंधित भागातल्या लोकांचा कसा फायदा होईल, परिसराचा “विकास’ कसा होईल, याचा पाढा आमच्या मित्रानं वाचला आणि चर्चा तिथेच थांबली. जे जातंय त्याची खंत बाळगायची नाही आणि जे येतंय त्याचं स्वागत वाजतगाजत करायचं, हा आता आपला शिरस्ताच झालाय. या चौकटीबाहेर विचार करणारा एकतर विकासाचा शत्रू किंवा नॉस्टॅल्जिक! एवढंच काय, या प्रवासाच्या परिणामांकडेही फारसं गांभीर्यानं पाहायचं नाही, हे आपण ठरवून टाकलंय. एखादा अहवाल येतो, आकडेवारी सांगतो, कारणमीमांसा करतो, एखादा दिवस बातमीचा विषय होतो आणि अडगळीत धूळ खात पडतो. ती बातमी वाचणाऱ्यांची संख्याही जेमतेम आणि वाचून अस्वस्थ होणारे तर नगण्यच. “क्लायमेट रिसर्च अँड सर्व्हिसेस सेंटर’ने असाच एक अस्वस्थ करणारा अहवाल दिलाय.
नैसर्गिक आपत्तींची संख्या आणि तीव्रता आपल्या देशात एवढी आहे की, गेल्या वर्षभरात या आपत्तींनी 2270 लोकांचा बळी घेतलाय. विशेष म्हणजे सर्वाधिक 1580 जणांचा मृत्यू वीज कोसळल्यामुळे झालाय, असं हा अहवाल सांगतो. 1901 नंतर सर्वाधिक तापमान 2022 मध्ये नोंदवलं गेलंय. यावर्षीचा संपूर्ण मे महिना अद्याप बाकी असल्यामुळे गेल्या वर्षीचा विक्रम यंदा मोडला जाईल का, याची धास्ती आहेच. खरं तर गेल्या वर्षी पाऊस चांगला, म्हणजे सरासरीच्या 108 टक्के झालाय. पण आजमितीस धरणांतील आटत चाललेले पाणीसाठे पाहिल्यास हवामान बदलाच्या समस्येची तीव्रता सहज लक्षात येईल. गेल्या वर्षी जिथे अतिवृष्टी झाली, त्या भागातील धरणेही आटत चाललीयेत. तापमानाइतकाच पावसाचाही अतिरेक मागील वर्षाने पाहिला.
परंतु अधिक काळजी करण्याजोगी बाब म्हणजे, देशभरात सरासरीपेक्षा 0.51 अंश सेल्सिअस अधिक तापमान नोंदवलं गेलं. पहिल्या औद्योगिक क्रांतीपूर्वी जगाचं जे सरासरी तापमान होतं, त्याहून दोन टक्क्यांपेक्षा अधिक वाढू द्यायचं नाही, असा जगाचा निर्धार होता. परंतु आर्थिक रेट्यामुळे ही मर्यादा केव्हाच ओलांडली गेलीये. विनाशाच्या वाटेवरही आर्थिक प्रगतीलाच आपण अधिक महत्त्व देतोय.
“समतोल’ हा शब्द आपल्याला कधी कळलाच नाही. आर्थिक विकास, इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास महत्त्वाचा आहे, हे मान्य केलं तरी त्यामुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई करण्याचा कोणताही मार्ग आपण कधी शोधलाच नाही. आर्थिक विकासासाठी निसर्गाचा बळी देणं आपण जणू अपरिहार्यच मानलं. नैसर्गिक आपत्तींनी सर्वांत मोठा तडाखा शेती आणि शेतकऱ्यांना दिलाय. परंतु भविष्यात अन्नटंचाईचं संकट जरी उभं राहिलं, तरी आपण नोटा खाऊन जगू शकतो, अशाच धुंदीत आपण वावरतो आहोत.