– हिमांशू
नातं म्हणजे खरंच काय असतं? अनेक नात्यांमधून अनेक व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात. कुणी रक्ताच्या नात्यातले असतात कुणी सगेसोयरे असतात तर बहुसंख्य नाती ङ्गक्त ‘अपेक्षा’ या एकाच पायावर उभी असतात. आपण जेवढं देऊ, तेवढं आपल्याला मिळतंय का, याचा हिशेब करतच आपण नाती जोपासत असतो. त्यामुळेच मग समाजात जे कुणाच्या उपयोगाचे नाहीत, ते कितीही विद्वान आणि कितीही कुशल असले तरी त्यांना किंमत नसते. अगदी घरातसुद्धा नात्यांची सुरुवात अपेक्षांनीच होते.
लहानपणी आपण चांगल्या मार्कांनी पास होऊ आणि करिअर घडवू अशी अपेक्षा केली जाते. तरुणपणी अपेक्षा पूर्ण होणार असतील तरच लग्न जमतं. उतारवयात आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय-काय केलं यापेक्षा आपल्यासाठी काय ‘ठेवलं’ याचा हिशेब केला जातो. कंत्राटी रोजगाराच्या सध्याच्या जमान्यात अनेकांना म्हातारपणी मानानं जगण्याइतकी शिल्लक टाकता येत नाही. तो त्यांचा दोष नसतो, तर मर्यादा असते. पण मुलं इतरांशी तुलना करून आईवडिलांचं ‘मूल्य’ ठरवतात.
काही मुलं तर भरघोस श्रीशिल्लक असणार्या आईवडिलांकडेही पाठ ङ्गिरवतात आणि मग वृद्धाश्रम गजबजतात. काही आईवडील आपल्या मुलांचं वागणं खुलेपणानं स्वीकारतात तर काहीजण अपरिहार्यता म्हणून स्वीकारतात. काहीजण आपल्याकडे दुर्लक्ष करणार्या मुलांना कोर्टात वगैरे खेचून धडा शिकवायचा प्रयत्न करतात. या सगळ्यांच्याच बाबतीत एकच प्रश्न पडतो, तो म्हणजे नातं गेलं कुठे?
म्हातारपणातला एकटेपणा खायला उठतो. शरीर थकलेलं असतं, त्यामुळे माणूस निरुपयोगी ठरलेला असतो.
बर्याचदा अशी माणसं ‘अडगळ’ ठरतात. अशा वेळी काही वयोवृद्ध मंडळी आपापला विरंगुळा, आपापली साथसोबत शोधून काढतात. मुके जीव हा त्यासाठी एक उत्तम पर्याय ठरतो. पाळीव प्राणी त्यांना लळा लावणार्यांच्या आजूबाजूला सतत राहतात. त्यांना एकटेपणाची जाणीव होऊ देत नाहीत. बोलताच येत नसल्यामुळे भावभावना व्यक्त करण्याची त्यांची पद्धत वेगळी असते. त्यांच्याकडे लक्षपूर्वक पाहिलं, तर त्यांच्या मनात काय चाललंय हे हळूहळू समजू लागतं. रक्ताच्या नातलगांनी जे करायला हवं होतं, ते जर हे जीव करणार असतील तर मग तेच आपल्या इस्टेटीचे वारसदार का असू नयेत?
शांघायमधल्या एका वृद्धेची बातमी वाचून तिच्या मनातली खळबळ लख्ख समोर उभी राहिली. 2.8 दशलक्ष डॉलर म्हणजेच सुमारे 23 कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्तीची मालकीण असूनसुद्धा तिच्या मुलांनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं. पण कायद्यानं तिच्या संपत्तीचे वारसदार तिची मुलंच ठरणार. पण या वृद्धेनं कायद्यालाही आव्हान दिलं आणि आपली सगळी संपत्ती पाळीव कुत्र्यांच्या आणि मांजरांच्या नावावर केली.
चीनमधल्या कायद्यानुसार असं करता येत नाही. पण या वृद्धेनं त्यावरही तोडगा शोधून काढला. तिनं आपली संपत्ती एका संस्थेच्या नावावर केली आणि आपल्या पाळीव प्राण्यांचा सांभाळ त्या रकमेतून केला जावा, असं मृत्युपत्र लिहून ठेवलं. बिचारे मुके जीव कोट्यवधींच्या संपत्तीचं करणार तरी काय? शिवाय, त्यांच्यानंतर कोण? हा प्रश्न होताच. पण मृत्युपत्रानुसार, तिच्या पाळीव कुत्र्यांना आणि मांजरांना होणारी पिलं आणि त्यांचा पुढचा सगळा वंशच तिच्या इस्टेटीवर पोसला जाणार आहे. आहे ना भन्नाट शक्कल?