हिमांशू
विहीर चोरीला गेल्याची घटना आपल्याला “जाऊ तिथं खाऊ’ या मराठी चित्रपटात दिसली होती; परंतु प्रत्यक्षातही चोरीच्या अशा अनेक विचित्र घटना घडत असतात. गुहागर तालुक्यातल्या वेळंब गावात अशीच घटना उघडकीस आली होती. विहीर मंजूर झाली, अनुदान मिळालं आणि नंतर विहीर दिसेनाशी झाली. हिंगोली जिल्ह्यातल्या येहळे गावात तर शेतात विहीर नसतानासुद्धा संबंधित शेतकऱ्यावर 4 हजार युनिट विजेची चोरी केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. दोन दिवस पोलीस कोठडीतही राहावं लागलं. शेतातल्या विहिरीतून पाणी काढण्यासाठी वापरलेल्या पंपासाठी वीज चोरल्याचा आरोप आपल्यावर आहे,
हे समजल्यावर शेतकऱ्याला धक्काच बसला, कारण शेतात विहीरच नव्हती. विशेष म्हणजे विहिरीजवळ पंचांच्या साक्षीनं केलेला पंचनामाही दाखल झाला होता. अशा घटनांबद्दल ऐकलं की सराईत चोर एखाद्याचं नशीबसुद्धा चोरून नेईल, अशी भीती वाटू लागते. पण ही झाली नसलेल्या विहिरींच्या चोरीची प्रकरणं. अस्तित्वात असलेल्या वस्तूही कधीकधी अशा प्रकारे गायब होतात की, बघणाऱ्याचा डोळ्यांवर आणि ऐकणाऱ्याचा कानांवर विश्वास बसत नाही. बिहारच्या सासाराम जिल्ह्यात अशाच प्रकारे एक पूल चोरीला गेलाय. यात कोणत्याही प्रकारची “अदृश्य कलाबाजी’ नाही. बऱ्याच वर्षांपासून खरोखर अस्तित्वात असलेला लोखंडी पूल सगळ्यांच्या डोळ्यांदेखत तोडून-मोडून, वाहनात भरून चोरट्यांनी पळवला; मात्र गावातल्या एकालासुद्धा त्यांच्याविषयी शंका आली नाही,
हे चोरट्यांचं खरं कसब! पुलाची लांबी 60 फूट आणि वजन 500 टन. अशी वस्तू सर्वांसमक्ष तोडूनमोडून चोरणं सोपं आहे का? पण चोरांची खेळी इतकी “अभ्यासपूर्ण’ होती, की ते निघून जाईपर्यंत कुणाला कळलंही नाही. विशेष म्हणजे चोरी तीन दिवस सुरू होती… तीही दिवसाढवळ्या! ग्रामस्थांच्या सोयीसाठी 1972 मध्ये कॅनॉलवर बांधलेला हा पूल हळूहळू निकामी झाला होता. ग्रामस्थांनी खटपट करून नवा कॉंक्रिटचा पूल बांधून घेतला होता. जुना निकामी पूल अडथळा ठरत होता, त्यामुळे ग्रामस्थांनीच सिंचन विभागात तक्रार केली आणि जुना पूल तोडून नेण्याची मागणी केली. एके दिवशी “सिंचन विभागाचे अधिकारी’ गावात आले.
सोबत बरीच सामग्री होती. त्यात जेसीबी आणि गॅस कटरचाही समावेश होता. सोबत आलेल्या “कामगारांना’ त्यांनी पूल तोडण्याचे आदेश दिले. अडचण जाणार म्हणून ग्रामस्थ खूश झाले. आधुनिक यंत्रसामग्री असली तरी पूल तोडायला तीन दिवस लागले. ग्रामस्थ जाता-येता या “कामा’वर लक्ष ठेवून होते. लोखंडाचे छोटे-छोटे तुकडे करून वाहनात भरले जात होते आणि रोज संध्याकाळी ते वाहन लोखंड घेऊन रवाना होत होते. 500 टन लोखंड ताब्यात आल्यानंतर “अधिकाऱ्यांनी’ काम थांबवलं आणि ग्रामस्थांचा निरोप घेतला.
या संपूर्ण घटनेतला सर्वांत गमतीशीर भाग असा की, सिंचन विभागाच्या स्थानिक कर्मचाऱ्यांनीसुद्धा आपले “वरिष्ठ’ ओळखले नाहीत. पूल तोडण्याच्या कामाला त्यांनी उत्स्फूर्तपणे सहकार्य केलं. हे आपले बॉस नव्हेत हे कनिष्ठ अभियंत्यालासुद्धा फार उशिरा कळलं. एकेकाळी ग्रामस्थांना उपयुक्त ठरणारा हा लोखंडी पूल अचानक “अडथळा’ ठरू लागला. तो हटवण्यात होत असलेल्या दिरंगाईचा आणि त्यामुळे ग्रामस्थांचा होत असलेल्या त्रासाचा “अभ्यास’ करून चोरटे 500 टन लोखंड घेऊन गेले.