हिमांशू
पाय जमिनीवर असोत वा नसोत, नजर सगळ्यांची आभाळाकडेच लागलेली असते. पहिल्यापासून आपली मानसिकताच ऊर्ध्वगामी असते. बोलताही न येणारं मूलसुद्धा “बाप्पा कुठे असतो,’ या प्रश्नाचं उत्तर देताना आभाळाकडे बोट दाखवतं. शैक्षणिक करिअर असो किंवा प्रगतीचा ग्राफ, तो वर-वरच जाणारा असतो. सेन्सेक्सची दिशा दाखवणारा शेअर मार्केटचा बाण थोडा खालच्या दिशेनं झुकला की लोकांच्या पोटात गोळा येतो आणि वरच्या दिशेला वळला की मनातल्या मनात आकडेमोड सुरू होते.
एखादा माणूस विमानसेवेशी संबंधित कंपनीत काम करतो असं कळलं, की तो माणूस आपल्याला खूप मोठा वाटू लागतो. एवढंच कशाला, विमान कंपनीची दिवळखोरी हासुद्धा “इव्हेन्ट’ ठरतो. आकाशी झेप घेण्याचे संस्कार घेऊन आपण लहानाचे मोठे झालो; पण आकाशात भराऱ्या मारणाऱ्या पक्ष्यांची संख्या कमी होऊ लागली तेव्हा त्या विषयाकडे आपण ढुंकूनही बघितलं नाही. पाखरांची संख्या कमी होण्याला तंत्रज्ञान जबाबदार असल्याचं बोललं गेलं. नेमकं बोलायचं तर मोबाइल टॉवरच्या रेडिएशनचा दुष्परिणाम म्हणून पाखरं दूर गेल्याचा आरोप झाला आणि तो खोडलाही गेला.
परंतु स्पेक्ट्रम विकत घेण्यासाठी अब्जावधी खर्च करणाऱ्या दूरसंचार कंपन्यांनी या बाबतीत शंकानिरसनासाठी काहीच केलं नाही. टू-जी, फोर-जी, फाइव्ह-जी अशा क्रमानं आपण उंच-उंच जातच राहिलो. डोळ्यांपाठोपाठ कानही हेडफोनमुळे निष्कर्षहीन चर्चा मुकाट ऐकू लागले. फाइव्ह-जी नेटवर्क दाराशी उभं असल्यामुळे आपल्या देशातल्या 13 शहरांमधले लोक शहारलेत. या शहरांमध्ये यावर्षी हे नेटवर्क येणार आहे. मार्च-एप्रिलमध्ये फाइव्ह-जी स्पेक्ट्रमचे लिलाव होतील, असंही सांगितलं जातंय.
अनेकांनी जुने फोर-जी हॅंडसेट निवृत्त करण्याची तयारीही सुरू केलीय. पण अमेरिकेतून येणाऱ्या बातम्या ऐकून ही मंडळी जरा धास्तावलीत. अमेरिकी लोकही असेच आकाशाकडे डोळे लावून बसले होते; पण त्यांना अचानक विमानं दिसेनाशी झाली. पक्षी दिसेनासे झाल्यावर ज्यांना काहीच वाटलं नाही, असे लोक विमानं हरवल्यावर मात्र दचकले. अनेक विमानांनी सेवा थांबवल्याची बातमी आली आणि सुरू झाला शोध कारणाचा! विमानतळांच्या आसपास फाइव्ह-जी टॉवर असल्यामुळे विमानसेवा थांबल्याचं समजलं. मोबाइल सेवेसाठी सामान्यतः तीन बॅंड वापरले जातात. कमी, मध्यम आणि तीव्र लहरींचा बॅंड.
यापैकी फाइव्ह-जीसाठी अमेरिकेत मध्यम लहरींचा बॅंड वापरला जातोय. नेमक्या याच बॅंडचा उपयोग विमानातल्या अनेक उपकरणांमध्ये केला जातो. त्यातलं महत्त्वाचं उपकरण आहे अल्टिमीटर. म्हणजे विमान समुद्रसपाटीपासून किती उंचीवर आहे, हे सांगणारं यंत्र. विमान उतरवताना फाइव्ह-जी टॉवरमुळे फ्रिक्वेन्सीचा घोळ होऊन वैमानिकाचा अंदाज चुकू शकेल, असं कारण सांगून विमान कंपन्यांनी उड्डाणं रोखली. विमानसेवा की फाइव्ह-जी नेटवर्क… निवड कशी करणार?
हा तिढा सुटेल आणि दोन्ही सेवा आकाशमार्गाने सुरू होतील, अशी आशा करूया. पण मुद्दा असा, की अशा गंभीर मुद्द्यांवर आजही केवळ दावे-प्रतिदावेच कसे ऐकायला मिळतात? ठोस पुराव्यांसह दोन्ही बाजूंनी काहीच कसं पुढे आणलं जात नाही? माणूस एकदा “यूजर’ झाला, की त्याच्याही मनातलं गांभीर्य निघून जातं. मुळात हा विषय समर्थक-विरोधक अशा स्टाइलनं हाताळणंच चुकीचं आहे. ना ह्यांचा ना त्यांचा, वास्तवाचा विजय होणं अपेक्षित!