मुंबई – राज्यातील शाळा आजपासून पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत मात्र पालकांचा मुलांना शाळेत पाठविण्यास विरोध असल्याचे चित्र राज्यात दिसून येत आहे. करोनाची वाढती आकडेवारी बघून पालक मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत. दरम्यान राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पालकांना मुलांना शाळेत पाठविण्याचे आवाहन केले आहे.
राजेश टोपे म्हणाले की, युरोपात कोरोनाची लाट सुरू असताना शाळाही सुरू आहेत. राज्यभरातील रुग्णालयांमधील 90 ते 95 टक्के बेड रिकामे असून, रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही कमी आहे. या सर्व बाबींचा अभ्यास करूनच शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळेत कोविडचे सर्व नियम पाळले जाणार असून, पालकांनीही मुलांना शाळेत पाठवावे, योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्री यांनी केले आहे.
राज्यात करोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. असे असताना राज्य शासनाने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यास विरोध दर्शविला आहे. त्यामुळे मुलांना शाळेत पाठविण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आवाहन केले आहे.