स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार निर्दलीय असावा
पुणे, दि. 23 – ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, तर निर्दलीय लोकप्रतिनिधीद्वारा कारभार चालावा, असे विचार जयप्रकाश नारायण यांनी पुणे महानगर पालिकेने दिलेल्या मानपत्राचा स्वीकार करताना काढले. नारायण पुढे म्हणाले, हा कारभार होताना त्यासाठी 200-250 कुटुंबाचा गटप्रतिनिधी, त्यांचा वॉर्डनिहाय प्रतिनिधी व त्यातून महापालिका प्रतिनिधित्व अशी तीन पायऱ्यांची स्थानिक स्वराज्य संस्था असावी. म्हणजे जी कामे खालच्या थरावर व्हावयाची, त्यासाठी वर जावे लागणार नाही आणि तळातील प्रतिनिधीला स्थान मिळाल्याने विकासाला वाव राहतानाच या लोकप्रतिनिधींवर लोकांचे नियंत्रण राहील. ग्रामस्वराज्याची कल्पना बळवंतराव मेहता व आपणास मान्य होती.
भारत-पाकिस्तान व्यापार करार
नवी दिल्ली – भारत व पाकिस्तान यांच्या प्रतिनिधींनी आज इस्लामाबाद येथे व्यापार करारावर सह्या केल्या. हा करार ताबडतोब अंमलात येणार आहे. ही मुदत एक वर्षाची आहे; परंतु ती दोन वर्षांनी वाढविता येईल. भारताच्या वतीने वाय. टी. शाह व पाकिस्तानच्या वतीने नाईक या व्यापार सचिवांनी करारावर सह्या केल्या.
दलितांच्या जमिनी परत मिळण्यासाठी आंदोलन
कोल्हापूर – कुळ कायद्यातून दलितांच्या जमिनी मुक्त करून परत मिळाव्यात व सरकारी मालकीच्या सर्व जमिनी दलितांनाच मिळाव्यात तसेच 34 टक्के नोकऱ्या मागासवर्गीयांना देण्यात याव्यात इत्यादी मागण्याच्यांवर संघटित रीतीने परिणामकारक प्रखर आंदोलन करण्याचा निर्णय कागल तालुक्यात घेतला आहे.