हिमांशू
“पीड पायपर’ची गोष्ट लहानपणी ऐकली होती, तिचा प्रत्यय येण्याचा वेग आता झपाट्याने वाढत आहे. पीड पायपर अर्थात पिपाणी वाजवत नगरात येणारा जादूगार उंदरांना संमोहित करतो आणि नगराबाहेर सोडून येतो. मोहीम फत्ते झाल्यावर मात्र राजा त्याला ठरल्याप्रमाणं बिदागी द्यायला नकार देतो. मग तो पुन्हा पिपाणी वाजवू लागतो आणि त्याच्या पाठोपाठ नगरातील सर्व लहान मुलं झपाटल्याप्रमाणं चालू लागतात.
त्यांना एका गुहेत कोंडून पीड पायपर पुन्हा राजाकडे जातो आणि मुलांना सोडवण्याच्या मोबदल्यात दुप्पट बिदागी वसूल करतो. सोशल मीडिया हा आजचा पीड पायपर आहे; अर्थात त्याने आपल्याला उंदीरमुक्त करण्याचं सत्कृत्य केलेलं नाही. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चालवणाऱ्या कंपन्यांनी नियमांचं, कायद्यांचं पालन करावं म्हणून केवळ भारतच नव्हे तर जगातल्या असंख्य देशांमधील सरकारे त्यांच्यावर दबाव आणत आहेत.
परंतु या प्लॅटफॉर्मवर मोहित झालेल्यांची संख्या इतकी अफाट आहे, की सरकारी प्रयत्न तोकडे पडतात. आपल्याच राज्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर ज्या चर्चा विधिमंडळात होणं अपेक्षित आहे, असे गंभीर विषय ट्विटरच्या हवाली झालेत. “पुरावे असतील तर न्यायालयात जा… सोशल मीडियावर बदनामी नको,’ असं सगळेच एकमेकांना सांगताहेत; पण शेवटी आपलं म्हणणं ट्विटरवरच मांडताहेत. राज्यकर्ते आणि विरोधकर्तेच सोशल मीडियाचे आश्रित असतील तर बिचाऱ्या जनतेचं काय..?
या पार्श्वभूमीवर, एका “नामांतरा’च्या निमित्तानं सोशल मीडियाचं भविष्यातलं जे रूप दिसलंय, ते प्रत्यक्षात आल्यावर लोकांनी एकमेकांना प्रत्यक्ष भेटणं पूर्णपणे बंद होईल की काय, अशी साधार भीती वाटते. शहरांपासून स्टेडियमपर्यंत अनेक गोष्टींची नावं बदलण्याविषयीचं कॅम्पेन
आणि त्याच्या क्रिया-प्रतिक्रिया आपल्याकडे सोशल मीडियावर हॅशटॅगच्या माध्यमातून उमटतच असतात; परंतु एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने जेव्हा नाव बदललं, तेव्हा जगाने भुवया उंचावल्या. वास्तविक कंपनीचं “री-ब्रॅंडिंग’ करण्याचा विचार या नामबदलामागे होता,
असं जाणकारांचं म्हणणं आहे. कारण संबंधित प्लॅटफॉर्मवर यूजर मंडळींच्या खासगीपणाची ऐशी-तैशी होत असल्याचं प्रकरण कंपनीच्याच माजी कर्मचाऱ्यानं बाहेर काढलं. अमेरिकी वर्तमानपत्रांत वृत्तांतांची मालिका प्रसिद्ध झाली. मग कंपनीने नाव बदलण्याची आयडिया लढवली, असं “फेसबुक’बद्दल सध्या बोललं, लिहिलं जातंय.
कंपनीच्या “मेटा’ या नव्या नावाचा अर्थ शोधताना समजलं की, शंभर वर्षांपूर्वीच्या एका कादंबरीतला नायक आभासी जगात पोहोचतो. त्या जगाला “मेटावर्स’ नाव दिलेलं होतं. असंच आभासी जग उभं करण्याचा कंपनीचा प्रयत्न असून, पाच वर्षांत हे जग तयार होईल; पण नाव आजच बदललं असं कंपनीकडून सांगितलं जातंय. “व्हर्च्युअल रिऍलिटी’ म्हणजे आभासी वास्तव या तंत्रज्ञानाचा वापर करून हे जग सजवलं जाईल.
एक “हेडसेट’ घालून आपण या आभासी जगात प्रवेश करू. आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, व्हिडिओ कॉलवरून आपण बोलतोच; मात्र “मेटावर्स’मध्ये आपण थेट संबंधिताच्या घरात गेल्याचा भास होईल. ऑनलाइन फिरायला जाता येईल;
नाट्यगृहात आणि सिनेमागृहांतही जाता येईल. कपड्यांच्या दुकानात “ऑनलाइन ट्रायल’ घेता येईल. जाणकार म्हणतात, हे तंत्रज्ञान यायला दहा वर्षें लागतील..! कधी का येईना… आपला डेटा कितपत सुरक्षित, हा प्रश्न तूर्तास मागे पडला की नाही?