– हिमांशू
‘आपुले मरण पाहिले म्या डोळा। तो जाला सोहळा अनुपम्य॥ असं केवळ तुकोबाच म्हणू शकतात. किंबहुना व्यक्ती संतपदाला पोहोचली, तरच स्वतःच्या मरणाचा सोहळा ‘अनुपम्य’ वाटू शकतो. घटकाभर कल्पना करा, एखाद्याला खरोखर आपलं मरण पाहायला, अनुभवायला मिळालं तर काय होईल? स्वप्नात जरी असं काही दिसलं तरी माणूस खडबडून जागा होईल. त्याला दरदरून घाम ङ्गुटेल. एखाद्याला हृदयविकाराचा झटकाही येईल. पण स्वप्नाचं विस्मरण होऊन पुन्हा सगळं नॉर्मल झाल्यानंतर काय होईल? डोळ्यांसमोर स्वतःचं मरण बघितलं, म्हणून तो आपल्या वर्तनात बदल करेल का? त्याची मानसिकता बदलेल का?
नीतीनियमात न बसणारं कृत्य करताना त्याला अवघडल्यासारखं वाटेल का? अंतिम सत्य दिसलं म्हणून तो स्वार्थाचा त्याग करेल का? विषय अध्यात्माकडे नेण्याचा इथे बिलकूल इरादा नाही. एवढंच सांगायचं आहे, की मरणासारख्या कोणत्याही अप्रिय घटनेची केवळ कल्पनाच करता येईल, असा काळ मागे टाकून ती घटना प्रत्यक्ष पाहता-अनुभवता येईल अशा काळात आपण पोहोचलो आहोत. दुर्दैव एकच, काळ इतका बदलूनसुद्धा आपण अजिबात बदललो नाही. व्हर्च्युअल रिअॅलिटीसारख्या माध्यमाने आपल्याला हवं ते पाहण्याची संधी दिली, कल्पना करण्यात वेळ आणि एनर्जी आता खर्च करावी लागत नाही.
पण तिथेही आपण काय पाहतो आहोत? सामूहिक बलात्कार! म्हणजे, आभासी दुनियेत जातानाही मनाचा ओंगळपणा कायम आहे. ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’ अशी म्हण आहे. आता स्वप्नाची वाट न पाहता ङ्गक्त एक उपकरण डोळ्यांवर लावायचंय. आपलाच एक ‘अवतार’ तयार करायचाय आणि सोडून द्यायचाय त्या आभासी दुनियेत! मनात आलं तर ऑस्ट्रेलियाला जा, अमेरिकेत जा किंवा आङ्ग्रिकेत जा! जगातली आश्चर्य बघा, विविधता बघा, नद्या आणि पर्वत बघा, समुद्रकिनारे बघा, उत्तमोत्तम सिनेमे बघा, हवे ते खेळ खेळा, व्हर्च्युअल पिकनिक अरेंज करा, मनाला आणाल ते स्वप्नात नाही तर जागेपणी घडेल. मेटाव्हर्सने ही रंगीबेरंगी दुनिया खुली केलीये.
पण धक्कादायक बाब अशी की, व्हर्च्युअल विश्वातही सामूहिक बलात्कार झालाय आणि अशा प्रकारची पहिलीच तक्रार पोलिसात दाखलही झालीये. वास्तविक, आभासी दुनियेत काहीही केलं तरी गुन्हा दाखल होईपर्यंत प्रकरण जाणार नाही, अशी संबंधितांची समजूत असावी. परंतु सोळा वर्षांच्या ज्या मुलीवर व्हर्च्युअल बलात्कार झाला, तिच्या मानसिक आणि भावनिक विश्वाला मोठा धक्का बसला. ती कुठलासा गेम खेळत होती, त्यावेळी व्हर्च्युअल रूममध्ये अनेकजण होते. पाचजणांनी तिच्या ‘अवतारा’वर हल्ला चढवून त्याचे लचके तोडले, तो तिच्यासाठी धक्काच होता.
संबंधित पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय खरा; पण अशा खटल्याची कायदेशीर प्रक्रिया काय असणार? त्यांना अटक होणार का? शिक्षेची तरतूद काय? अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. पण व्हर्च्युअल विश्वात सर्वकाही स्वप्नवत् सुंदर असताना हीच पाशवी इच्छा डोकं वर का काढते? या प्रश्नाचं उत्तर शोधलंच पाहिजे. हे तंत्रज्ञान सार्वत्रिक व्हायला अजून वेळ असला, तरी जेव्हा ते होईल तेव्हा आपण त्याला कसे सामोरे जाणार? आजच सोशल मीडियावर शिवीगाळ करणारे व्हर्च्युअल विश्वात काय-काय करतील?