हिमांशू
बऱ्याच वेळा एखाद्या देवस्थानची महती सांगणाऱ्या व्यक्तींच्या तोंडून एखाद्या चोरीच्या घटनेचा उल्लेख केला जातो. “चोरांना येताना रस्ता सापडला; पण जाताना त्यांची फसगत झाली आणि रस्ता चुकून ते ग्रामस्थांच्या हाती लागले,’ असं वर्णन ऐकायला मिळतं. कधीकधी “देवांचे दागिने चोरल्यावर लगेच चोरांचे डोळे गेले आणि त्यांना मंदिराचं प्रवेशद्वार दिसेना,’ असंही सांगितलं जातं. बऱ्याच मंदिरांमध्ये देवदेवतांच्या मूर्ती अलंकारांनी सजवलेल्या असतात.
या अलंकारांची चोरी होऊ नये, एक दरारा निर्माण व्हावा अशा हेतूनं या कहाण्या सांगितल्या जात असाव्यात असं पूर्वी वाटायचं. मंदिरात झालेल्या अनेक चोऱ्या “अनडिटेक्ट’ राहिल्याचे किंवा चोरांनी पोलिसांना घाम फोडल्याचे अनेक प्रसंग घडल्यामुळे या कपोलकल्पित कहाण्या वाटणं स्वाभाविकच आहे. अलीकडच्या काळातली अशा प्रकारची सर्वांत मोठी चोरी म्हणजे दिवेआगर येथील सोन्याच्या गणेशमूर्तीची.
या घटनेतील चोर सापडले आणि त्यांच्यावर खटलाही चालला. परंतु सुवर्णगणेश चोरांनी वितळवून टाकल्यामुळे मूळ मूर्ती परत मिळाली नाही, याची रुखरुख सर्वांनाच लागली. अर्थात, तेवढ्याच सोन्याची नवी मूर्ती तयार करून तिची विधीवत् प्राणप्रतिष्ठाही झाली. परंतु चोरीच्या तपासात पोलिसांना प्रचंड परिश्रम घ्यावे लागले. बंद झालेल्या चोरीच्या फाइल पाहून देवस्थानांबद्दल रूढ कहाण्या या दंतकथाच असाव्यात असं वाटू लागतं आणि एखादी घटना अशी घडते की अशा कहाण्या खऱ्या वाटू लागतात.
असं असलं तरी अशा चोऱ्या करून पकडले जाणारे चोर एक तर निर्बुद्धपणे वागल्यामुळे पकडले जातात किंवा देवाच्या दारी आपण चोरी केल्याचा त्यांना ताण येत असावा आणि त्यामुळे त्यांच्या हातून एखादी चूक घडली असावी, असंही म्हणता येतं. अन्यथा ज्या जागेतून मंदिरात प्रवेश केला त्याच जागेतून बाहेर का पडता येऊ नये? हा प्रश्न पडावा असं उदाहरण आंध्र प्रदेशात परवाच घडलं. श्रीकाकुलम जिल्ह्यातल्या एका मंदिराची सिमेंटची खिडकी फोडून एका चोरट्यानं देवळात प्रवेश केला. मूर्तीला नऊ ग्रॅम चांदीचे दागिने अर्पण केले होते, ते त्यानं चोरले. मग त्याच फोडलेल्या खिडकीच्या भगदाडातून तो बाहेर पडू लागला.
परंतु त्याला बाहेर काही पडता येईना. चोरटा इतक्या विचित्र पद्धतीनं त्या भगदाडात अडकला, की अखेर मदतीसाठी त्याला लोकांना बोलावून घ्यावं लागलं. आपला “धावा’ ऐकून येणारे लोक आपल्याला सोडवतील का बडवतील, ही शंका त्याच्या मनात होतीच; पण तरी देवाचा धावा करण्याचं नैतिक बळ त्याच्यात उरलेलं नव्हतं. लोकांनी त्याला बडवलं की नाही हे समजू शकलं नाही; पण सोडवलं एवढं नक्की! शिवाय चोराला “कर्माचं फळ’ मिळालं असंही विनम्रपणे सांगितलं.
मागेही एकदा छत्तीसगडमधील एका मंदिरात चोरटे शिरले आणि त्यांनी दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी एका चोराचा हात दानपेटीतच अडकून बसला होता. उत्तर प्रदेशात तर विचित्रच घटना घडली होती. मंदिरात चोरी केल्यानंतर आपल्याला हजारो रुपये मिळाले, अशा कल्पनेत चोरटे खूश होते. परंतु रक्कम मोजल्यावर ती 7 लाख भरली. आकडा ऐकून दोघांपैकी एकाला हार्ट ऍटॅक आला होता. सगळे पैसे उपचारावरच खर्च झाले होते. आता बोला!