– हिमांशू
भूगर्भशास्त्रानुसार, टॅक्टॉनिक प्लेट्स म्हणजे जमिनीखालील प्रस्तराची हालचाल आणि ज्वालामुखीय बदलांमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर येणारे व्यत्यय ही भूकंपाची प्रमुख कारणे असतात. याखेरीज खाणकाम, बोगदे वगैरे मानवनिर्मित कारणेही कधीकधी भूकंपाला आमंत्रण देऊ शकतात, असं सांगितलं जातं. परंतु कारण कोणतंही असलं, तरी भूकंपाची पूर्वसूचना मिळू शकत नाही, हे आजचं वास्तव. कारण, कितीही प्रयत्न केला तरी सगळ्या हालचाली जमिनीच्या खाली होतात. गूढ कायम राहिल्यामुळेच भूकंपाची भीती आणि कुतूहल दोन्ही टिकून आहे. महाराष्ट्रात मात्र या दोन्ही पातळ्यांवर निराशाच आहे.
भूकंपाची ना भीती वाटते ना कुतूहल. साहजिकच आहे, पूर्वसूचना देणारे ‘तज्ज्ञ’ जागोजागी उगवू लागल्यावर गूढ उरतंच कुठे? आताही काही ‘तज्ज्ञ’ नव्या भूकंपाची वर्दी द्यायला लागलेत. कुणाच्या मते दोन दिवसांत होणार, तर कुणाच्या मते आठ दिवसांनी दणका शंभर टक्के! ही भविष्यवाणी कॅमेराबद्ध करून लोकांसमोर आणायला वृत्तवाहिन्या नेहमीपेक्षा अधिक उत्साहाने सक्रिय झाल्यात. दिवसच धामधुमीचे आहेत ना! पण खरं तर लोकांना भूकंपात मुळीच इंटरेस्ट राहिलेला नाहीये. कुठेही, कशीही, कितीही पडझड झाली, कुठेही खड्डा झाला, तरी कुणाला ङ्गरक पडणार नाही.
एकतर आपल्याकडच्या टॅक्टॉनिक प्लेटांनी जमिनीखालून सरकण्याचा नियम मोडलाय. कोण कुठे सरकणार, याचा बँड आधीच वाजतो. स्वतःला ज्वालामुखी समजणारे उन्हाळ्यातल्या शेकोटीइतके नकोसे झालेत. हे ‘धगधगते अंगार’ इकडून तिकडे गेले किंवा तिकडून इकडे गेले, तरी शेवटी जूनमध्ये आपल्याच खिशात येऊन पडणार याची सगळ्यांना खात्री आहे. ‘कितीही मोठ्ठा भूकंप झाला तरी आमचं काहीच जाणार नाही, कारण आमची घरं ऑलरेडी पडलेली आहेत,’ अशा कूल नजरेनं लोक हल्ली टीव्ही बघतात.
त्यातल्या त्यात मनोरंजक बाबी शोधतात आणि त्यांना त्या सापडतातही. उदाहरणार्थ, एसटीत 48 सिटा… पॅसेंजर भरलेत दोनशे… आणि सगळेच म्हणतायत, ‘आणखी काहीजण येणार’ हे वाक्य म्हणताना या मंडळींच्या चेहर्यावर उत्साह येतो कुठून? आधीच एसटीत जागांवरून भांडणं लागलेली. जागा अॅडजस्ट करता-करता ‘कंडक्टर’ मंडळींची दमछाक झालेली. तरी ओरडून-ओरडून नव्या पॅसेंजरना बोलवायचं म्हणजे केवढं डेरिंग राव! पुन्हा हा सगळा प्रकार लोकांनी ‘भूकंप’ म्हणून बघावा, टाळ्या वाजवाव्यात आणि ‘आम्हाला धक्का बसला बरं का,’ असा अभिनय करावा म्हणजे टू मच हं! ‘भूकंप’ शब्द इतका प्रभावशून्य कधीच नव्हता.
‘मोठा धक्का’ वगैरे शब्द इतके किरकोळ ठरल्याचं पाहून बिचार्या भूकंपाला नैराश्य आलं आणि तो तैवानकडे निघून गेला. 7.2 रिश्टर क्षमतेने त्यानं आपलं ङ्ग्रस्ट्रेशन बाहेर काढलं. बरीच पडझड झाली. सगळं पुन्हा उभं करायला किती पैसे लागतील, याचा अंदाजही कुणाला लागेना. चिनी सरकारी माध्यमं म्हणाली, ‘चीनच्या तैवान’मध्ये भूकंप झाला. मदत करायला हवी. पण तैवानने 1999च्या भूकंपानंतर दुसर्यांदा चीनची मदत नाकारली. भूकंपाला हायसं वाटलं. चला, धक्के पचवून स्वत्व जपणारं अजूनही कुणीतरी आहे!