– हिमांशू
सोशल डिस्टन्सिंग हा आजचा जीवनमंत्र असून, जीवन हवं असेल तर एकमेकांत अंतर राखणं हा गरजेचा आणि हळूहळू सवयीचा भाग बनत चाललाय. कोविडच्या जेवढ्या लाटा यायच्या असतील, तेवढ्या सगळ्या येऊन गेल्यानंतर तरी आपण एकमेकांजवळ यायला धजावू की नाही, अशी शंका येण्याइतपत दूर राहणं सवयीचं बनत चाललंय.
डिस्टन्सिंग माणसा-माणसात असलं तरी मनामनात येऊ नये, यासाठी सोशल मीडियाच्या आधारे एकमेकांना दिलासा देण्याचीही आता लोकांना सवय जडलीय. पण आणखी बरीच अंतरं नकळत वाढत चाललीत, त्याकडे आपलं पुरेसं लक्ष आहे का, असा प्रश्न पडतो. गेल्या वर्षी मार्चपासून आजतागायत एकही दिवस “नेहमीसारखा’ गेलेला नाही.
शाळा-कॉलेजं सुरू झाली म्हणता-म्हणता पुन्हा बंद झाली. ज्यांना अर्थव्यवस्थेची काळजी अधिक वाटते, त्यांनी डिजिटल व्यवहार, वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन खरेदी आणि डिजिटल शिक्षणाचा या निमित्तानं कसा प्रसार झाला, हे सांगायला सुरुवात केली. डिजिटल क्षेत्रात सध्या बाजारपेठेचा आकार केवढा आहे आणि चार-पाच वर्षांनी तो केवढा असेल, याचा तपशील मांडायला सुरुवात केली.
परंतु या सगळ्याशी तिळमात्र संबंध नसलेले लोक आपल्याकडे किती आहेत आणि त्यांचं काय करायचं, या विषयावर कुणीच बोलेना. आपल्याकडे शहरी-ग्रामीण, गरीब-श्रीमंत असं बरंच “सोशल डिस्टन्सिंग’ आधीपासूनच आहे आणि ते या काळात अधिकच वाढतंय.
“डिजिटल विषमते’चा प्रश्न या काळात विशेषत्वानं चर्चिला जातोय आणि त्यातून आपल्याकडची मूळची विषमता ठळकपणे समोर येतेय. शाळा-कॉलेजं बंद असल्यामुळे ऑनलाइन क्लासेस सुरू झाले. पण जिल्हा परिषदेच्या, नगरपालिकांच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांनी ऑनलाइन शिक्षण कसं घ्यायचं? त्यांच्या घरात ना टॅब, ना चांगला सेलफोन.
सेलफोन असलाच तरी क्लाससाठी रोज-रोज एवढा डेटा कुठून आणायचा? ज्या वर्गांच्या परीक्षा न घेता सर्वच विद्यार्थ्यांना पास केलं गेलं, तिथं समानता आहे. पण शिक्षण म्हणजे परीक्षा नव्हे. खरं तर ज्या मुलांना ऑनलाइन शिक्षण घेण्यात काहीच अडचण नाही, तीसुद्धा या मोबाइलमधल्या शाळेत फारशी रमली नाहीत. पण तरीही विषमता निर्माण झालीच. अगदी ताजं उदाहरण राज्य सरकारच्या जेईई नीटच्या ऑनलाइन प्रशिक्षण उपक्रमाचं देता येईल.
विज्ञान शाखेच्या अकरावीच्या वर्गात प्रवेशासाठी ऑनलाइन प्रशिक्षण देण्याचा उपक्रम “महाज्योती’च्या माध्यमातून सुरू झाला. 2900 जणांचे अर्ज त्यासाठी मंजूर करण्यात आले. परंतु प्रत्यक्ष प्रशिक्षणात शंभर विद्यार्थीही उपस्थित राहत नाहीत असं दिसून आलंय.
जेईई नीटसाठी बरेच विद्यार्थी शिकवणी लावतात. परंतु ती ज्यांना परवडत नाही, त्यांच्यासाठी हा उपक्रम राबवला जातोय. तिथंही साधनांअभावी शुकशुकाट दिसणं आपल्याला विचार करायला लावणारं आहे.
डिजिटल विश्वात आता आपण खूप मोठी मजल मारलीय. लॉकडाऊनच्या काळात घरबसल्या काम आणि घरबसल्या खरेदी यांचाही मोठा बोलबाला आहे. पण दुसरीकडे शहरातून गावाकडे चालत गेलेले लाखो मजूर आपल्याला नजरेआड करता येत नाहीत.
गरीब वर्गाचा विषय किमान राजकारणाच्या निमित्तानं तरी चर्चेत येतो. पण दुसऱ्या लाटेत आप्तांचा जीव वाचवण्यासाठी बचत खातं रिकामं करणारा कनिष्ठ मध्यमवर्गही नजरेतून सुटता कामा नये. हे “डिस्टन्सिंग’ आपण असंच वाढू देणार का?