हिमांशू
लोकप्रियता ही अजब गोष्ट आहे. ती कधी आणि कशी मिळेल हे जसं सांगता येत नाही, तसंच तिच्या पातळीचाही अंदाज घेता येत नाही. एखाद्याला लोकप्रियता मिळवण्यासाठी प्रदीर्घकाळ दिवसरात्र कष्ट उपसावे लागतात तर एखाद्याला रातोरात लोकप्रियता मिळते. कुणाला चांगल्या कारणामुळे ती मिळते तर कुणी नकारात्मक बाबींमुळे चर्चेत येतो आणि नंतर सुपरहिट ठरतो.
चित्रपटांची दुनिया तर या बाबतीत अगदीच निराळी! सकारात्मक किंवा नकारात्मक, कोणत्याही मार्गाने आपली चर्चा व्हावी, असे अनेकांना वाटतं. म्हणूनच अभिनय वगळून केवळ पेज-थ्री कल्चर, पार्ट्या आणि गॉसिपिंग यावर आधारित गुळगुळीत कागदांची नियतकालिकं इथे प्रचंड प्रमाणात खपतात. अनेकदा निव्वळ बातम्यांसाठी कुणाकुणाच्या जोड्या जुळवल्या जातात आणि जोड्या फुटल्याच्या बातम्याही चवीनं चघळल्या जातात.
प्रेयसीवर जीव ओवाळून टाकणाऱ्या सामान्य माणसाचा “प्रेमभंग’ आणि फिल्मी व्यक्तींचे करमणुकीखातर झालेले “ब्रेकअप’ यात प्रचंड तफावत असते. या सगळ्याचा आधार म्हणजे, सर्वसामान्य लोकांचं फिल्मी व्यक्तींवर असणारं वेडे प्रेम! खरं तर भक्तीच ती… मेगास्टार अमिताभ बच्चन जेव्हा सेटवर अपघात होऊन गंभीर जखमी झाले होते,
तेव्हा रुग्णालयासमोरच्या रस्त्यावर ठिय्या मांडून बसलेल्या असंख्य लोकांच्या चेहऱ्यावर असे काही भाव होते, जणू घरातलंच कुणीतरी ऍडमिट आहे. हे वेडे प्रेम कुणी नम्रपणे पचवतो तर कुणाला तेही जमत नाही.
या वेड्या प्रेमाची जी दोन ताजी उदाहरणं समोर आलीत, ती फिल्मी दुनियेच्या झगमगाटात काम करणाऱ्या प्रत्येक कलावंतानं डोळसपणे पाहायला हवीत. तसं पाहायला गेलं तर “शाहरुख खानचा मुलगा’ या व्यतिरिक्त आर्यन खानची स्वतःची म्हणून काय ओळख आहे? पण तो क्रूझवरून थेट तुरुंगात पोहोचल्यापासूनच शाहरुखच्या मनःस्थितीचा विचार करून त्याचे चाहते अस्वस्थ झाले. जामीन मिळून पंचवीस दिवसांनंतर आर्यन घरी पोहोचला,
तेव्हा ढोलताशांनी त्याचं स्वागत झालं. पण तत्पूर्वी तुरुंगातून बाहेर पडताना त्याला बघण्याची ओढ शेकडो लोकांना लागली होती. आर्थर रोड तुरुंगाबाहेर शनिवारी प्रचंड गर्दी झाली. “प्रचंड गर्दी म्हणजे चोरांना खुलं आमंत्रण’ हा तर मुंबईचा नियमच! त्यातच ती गर्दी भान हरपलेल्यांची असेल तर सोन्याहून पिवळं! आर्यनला पाहायला आलेल्यांपैकी दहा जणांनी आपले सेलफोन गमावले ते यामुळेच!
पराकोटीला पोहोचलेल्या बेभानपणाचं कौतुक करावं की या मंडळींची मानसिकता अचूक हेरल्याबद्दल चोरांना दाद द्यावी, हेच कळेनासं झालं. प्रेमाची ही गोष्ट काहीशी चमत्कारिक आहे; पण दुसरी गोष्ट खूपच गंभीर आणि दुःखद आहे. कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचं शनिवारीच निधन झालं. त्यानंतर जे-जे घडलं, ते ग्लॅमरच्या दुनियेतल्या प्रत्येकानं समजून घेतलं पाहिजे.
पुनीत राजकुमार यांच्या निधनाची बातमी ऐकून दोन चाहत्यांचा मृत्यू झाला आणि तिसऱ्यानं आत्महत्या केली. हृदयविकारानं मृत्यू पावलेल्यांमध्ये मुनियप्पा नावाच्या शेतकऱ्याचा समावेश आहे. बेळगावच्या अथणी तालुक्यात एका तरुणानं आत्महत्या केली.
पुनीत यांचा जिममध्ये व्यायाम करताना मृत्यू झाल्यानंतर कर्नाटकातली सर्व चित्रपटगृहं बंद केली गेली आणि अनेक ठिकाणी कलम 144 लावावं लागलं. चाहत्यांच्या या झपाटलेपणासाठी “वेडे प्रेम’ हीच संज्ञा योग्य. स्टारमंडळींनी त्याची बूज राखावी, इतकंच!