लहानपणी जेव्हा एखादं गणित वारंवार चुकत असे, तेव्हा शिक्षक म्हणायचे, “”जरा लक्ष देऊन कर ना!” एखादा अव्वल बॅट्समन जेव्हा वारंवार चकतो, तेव्हा कॉमेन्टेटर सांगतात, “”आज वो कॉन्सन्ट्रेट नहीं कर पा रहे हैं!” अभिनयावर “फोकस’ होत नसलेल्या अभिनेत्याला वारंवार “रिटेक’ घ्यावे लागतात. किंबहुना अवधान म्हणजे एकाग्रता हा अभिनयाच्या शास्त्रोक्त प्रशिक्षणातला प्राथमिक धडा आहे.
ड्रायव्हरचं लक्ष रस्त्यावर एकाग्र झालं नाही तर काय घडेल हे वेगळं सांगायची गरज नाही. पत्रकाराने बातमी लिहिताना एकाग्रता सोडली तर “ध’चा “मा’ कधी झाला समजणार नाही. साहित्यिकांना तर साधनेसाठी कमालीच्या एकाग्रतेची गरज भासते. संशोधक आपल्या कामावर फोकस करू शकला नाही तर प्रयोग यशस्वी होईल का? पहाऱ्याला उभा राहिलेल्या सैनिकाचं लक्ष शत्रूच्या हालचालींवर केंद्रित झालं नाही तर आपण सुरक्षित राहू का? सर्कशीतल्या कसरतपटूचं लक्ष विचलित झालं तर काय घडेल? तात्पर्य, जगातली असंख्य कामं अजूनतरी एकाग्रतेवर अवलंबून आहेत. ही सगळीच कामं जेव्हा यंत्रं करू लागतील तेव्हाचं तेव्हा बघता येईल; (त्यावेळी हाताला काम नसलेला माणूस काय करेल हा स्वतंत्र विषय) पण किमान आणखी काही वर्षे तरी आपल्याला एकाग्रतेची किंवा स्थिर मानसिक स्थितीची गरज आहे. तथापि आजकाल आपण एखाद्या कामात, अभ्यासात खरोखर एकाग्र होतो का?
एकाच गोष्टीवर एकाग्र होण्याची आपली क्षमता प्रचंडवेगानं कमी होत चाललीय आणि मनाची अस्थिरता, चंचलता तितक्याच वेगानं वाढतेय. इंटरनेटची दुनियाच याला कारणीभूत आहे हे इंटरनेटचा जमाना सुरू होण्यापूर्वीचे दिवस पाहिलेल्या लोकांना तरी किमान पटायला हरकत नसावी. ज्यांनी हातात मोबाइल घेऊनच या धरतीवर पहिलं पाऊल ठेवलं, त्यांनीही किमान विषय समजून घ्यायला हरकत नसावी. जोहान हॅरी नावाच्या अमेरिकी लेखकानं “स्टोलन फोकस’ नावाच्या नव्या पुस्तकात दिलेली माहिती छाती दडपून टाकणारी आहे. यापूर्वी नैराश्य आणि व्यसन याविषयी त्यांनी लिहिलेली पुस्तकं लोकप्रिय आहेत.
“स्टोलन फोकस’मध्ये त्यांचा दावा आहे की, सर्वसामान्य अमेरिकी माणूस आपल्या कामावर सलग तीन मिनिटेच लक्ष केंद्रित करू शकतो. याउलट तो आपल्या मोबाइलला दिवसातून किमान 2 हजार वेळा स्पर्श करतो. अमेरिकेच्या तुलनेत भारतात डेटा प्रचंड स्वस्त आहे. त्यामुळे आपल्या परिस्थितीचं अशा प्रकारे लवकरात लवकर मूल्यमापन होणं आवश्यक आहे. जोहान सांगतात, की याला “अटेन्शन क्रायसिस’ म्हणतात. टेक कंपन्यांच्या बिझनेस मॉडेलमध्ये या “अटेन्शन’वरच लक्ष केंद्रित केलेलं असतं आणि त्यातूनच त्यांना मोठी कमाई होते. म्हणजेच, आपलं लक्ष केंद्रित होणार नाही याकडे कंपन्यांनी लक्ष केंद्रित केलंय.
मग उपाय काय? जोहान यांनी स्वतःवर प्रयोग केले. तीन महिने इंटरनेटपासून दूर राहून त्यांनी रोज सक्तीनं आठ तास झोप घेतली. संगणकाच्या किंवा मोबाइलच्या पडद्यावर वाचण्यापेक्षा पुस्तकांच्या वाचनातून एकाग्रतेत वाढ होते असं त्यांना दिसून आलं. एकाग्रतेसाठी वेळ द्यावा लागतो आणि आजकाल तोच आपण देत नाही. तात्पर्य, दोनच रस्ते स्पष्टपणे आपल्यासमोर आहेत. एकतर एकाग्रतेसाठी वेळ द्यायचा किंवा जे पुढं येईल ते “अपरिहार्य’ म्हणून स्वीकारायचं!
हिमांशू