सोनई -चेत्र वैशाख आणि ज्येष्ठ महिना म्हणजे जागरण गोंधळाचा फुल सिझन असतो. ऐन सिझनच्या काळात लॉकडाऊन असल्यामुळे जागरण गोंधळातील गोंधळी कलाकारावर उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाऊनमुळे जागरण गोंधळ पार्टीचा पूर्ण सिझन वाया गेला आहे. त्याचबरोबर जागरण गोंधळ कार्यक्रमाला खिळ बसली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात जागरण गोंधळ पार्टीला 70 ते 80 कार्यक्रम मिळत असतात. एका कार्यक्रमाची सुपारी पाच ते नऊ हजार रुपये असते.
एका पार्टीमध्ये सहा गोंधळी व एक मुरळी असते. यंदा ऐन सिझनमध्ये लॉकडाऊन असल्यामुळे जिल्ह्यातील गोंधळी समाज आर्थिक संकटात सापडला आहे. विवाहानंतर नवविवाहित जोडपे जेजुरी वारी करुन आले की जागरण गोंधळ घातले जाते. काही कुटुंब सलग पाच वर्षे दारात भंडारा उधळीन असा नवस करतात चैत्री पौर्णिमेनंतर जागरणाचा गोंधळ सुरु होतो. यंदाच्या वर्षी करोनामुळे गावागावातील गोंधळ कार्यक्रमाला लगाम लागला आहे.
तिन महिन्यांच्या सिझनमध्ये एका कलाकाराला 50 ते 60 हजार रुपये मिळतात. करोनामुळे पुर्ण सिझन वाया गेल्याने जिल्ह्यातील दोन हजार कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. सोनई येथील गोंधळी किशोर साळवे यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे कलाकारांवर आलेल्या आर्थिक संकटाची माहिती दिली.
जिल्ह्यात आहेत 300 हुन अधिक पथके
नगर जिल्ह्यात गोंधळींची 300 हून अधिक पथके आहेत. एका पथकात सहा गोंधळी व एक मुरळी असते. सिझनच्या 90 दिवसांत एका पथकाला 70 ते 80 जागरण गोंधळाचे कार्यक्रम मिळतात. एका कार्यक्रमाची सुपारी 5 ते 9 हजार रुपये असते. सध्या लॉकडाऊन मुळे जिल्ह्यातील दोन ते अडीच हजार गोंधळी पैशावाचुन पुरते गोंधळून गेले आहेत. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
=========