विहिरीत पडलेल्या बैलाची सहा तासांनंतर सुटका
सातारा –विहिरीत पडलेला बैल वाचविण्यासाठी नगरसेवक, स्थानिक नागरिक व दहिवडी नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून प्रयत्न केले. अखेर सहा तासांनंतर या बैलाला विहिरीतून बाहेर काढण्यात यश मिळाले. अशा वेळी नगरपंचायतीकडे आपत्कालीन यंत्रणा असणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत होते.
दहिवडी येथे मोकाट जनावरे अन्नाच्या शोधात वाड्यावस्त्यांमध्ये शिरली होती. शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास काही जनावरे शहरात जाताना एक बैल विहिरीमध्ये 30 ते 35 फूट खोल पाण्यात पडला. नागरिकांनी नगरपंचायतीला माहिती दिली. काही वेळानंतर नगरसेवक रमेश जाधव व स्थानिक नागरिकांनी त्या ठिकाणी जेसीबी, क्रेन बोलावून रस्ता तयार केला व लाईटची सोय करण्यात आली.
विहिरीची पातळी 30 ते 35 फूट खोल असल्याने त्या ठिकाणी जाणे नागरिकांना अडचणीचे ठरत होते. नागरिकांनी विहिरीमध्ये उतरून त्या बैलाला पट्याने बांधले पण काही वेळातच बैल पाण्यात दुसऱ्या बाजूला गेला. त्यामुळे पुन्हा नगरपंचायत कर्मचारी व नागरिकांना दोन ते अडीच तास कसरत करावी लागली. शेवटी क्रेन मालक महेश भुजबळ यांनी पाण्यात उतरून रात्री अकराच्या सुमारास बैलाला दोन ठिकाणी पट्टा बांधला व क्रेनच्या साहाय्याने त्याला वरती काढण्यात आले. तब्बल सहा तासाच्या कसरतीनंतर बैलाला विहिरीमधून बाहेर काढण्यात आले. स्थानिक व नगरपंचायत कर्मचारी संघटना अध्यक्ष देवा देवकुळे, पिसाळ यांना जीव धोक्यात घालून बैलाला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.