– डॉ. ऋतु सारस्वत
“ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट’च्या अध्ययनात असे आढळून आले आहे की, पालक आपल्या मुलींना विज्ञान विषय घेण्यापासून केवळ परावृत्तच करतात असे नाही, तर विज्ञान आणि गणित यांसारखे विषय मुलींसाठी नसतात, असे त्यांच्या मनावर वारंवार सांगून बिंबवण्याचे काम करतात. वास्तविक, विज्ञान विषयाचा जैविकतेशी काहीच संबंध नाही.
देशात लैंगिक गुणोत्तर सुधारले असल्याची सकारात्मक बातमी गेल्या वर्षात ऐकायला मिळाली. मुलींच्या वाढत्या लोकसंख्येवरून स्वतःची पाठ थोपटून घेण्यापूर्वी एक प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. तो म्हणजे, जे स्थान मुलींना समाजात मिळायला हवे, ते देण्यास समाज तयार आहे का? अनेक सर्वेक्षणांमधून असे दिसून आले आहे की, मुलींचे पंख पितृसत्ताक व्यवस्था अद्यापही स्वतःच्या मुठीत ठेवते. शिक्षण हा आत्मबळ आणि आत्मविश्वास जागृत करण्याचा आधारस्तंभ आहे.
परंतु दोन वर्षांपूर्वी झालेल्या संशोधनात (ऍडम्स अँड अँड्य्रू 2019) असे आढळून आले आहे की, भारतात मुलींना सुशिक्षित बनविण्यासाठी त्यांच्या पालकांची प्रेरणा एकच आहे. ती म्हणजे, “चांगले शिक्षण घेतल्यामुळे चांगल्या पगाराची आणि सुरक्षित नोकरी असलेल्या युवकाशी विवाह जुळण्याची शक्यता वाढेल.’ स्वतःला आधुनिक आणि उदारमतवादी म्हणून घोषित करणारे पालकसुद्धा मुलींना अशा विषयात शिक्षण घेण्यास सांगतात, ज्या विषयांना लग्नाच्या बाजारात चांगली मागणी आहे. याच कारणामुळे अनेक दशकांपासून मुलींना गणित आणि विज्ञान हे दोन विषय घेण्यासाठी प्रोत्साहन अजिबात दिले जात नाही.
मुलींच्या प्रती पालकांचा असलेला हा संकुचित दृष्टिकोन पुढे मुलींनी स्वावलंबी बनण्याच्या शक्यता संपवून टाकणार आहे. कारण आगामी काळात ज्या क्षेत्रांमध्ये नोकरीची शक्यता सर्वाधिक आहे, त्या सर्व क्षेत्रांचा संबंध विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणिताशी आहे. एका अंदाजानुसार, भविष्यात नव्वद टक्के नोकऱ्या अशा असतील ज्यासाठी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात माहिती तंत्रज्ञानाचे ज्ञान असणे आवश्यक असेल. संयुक्त राष्ट्र महासचिवांनी काही दिवसांपूर्वी असा इशारा दिला आहे की, पुराणमतवादी विचारसरणीमुळे मुलींना विज्ञानाशी संबंधित क्षेत्रांपासून दूर राहावे लागले आहे. विज्ञान, गणित आणि तंत्रज्ञान या विषयात मुलींची योग्य संख्येने उपस्थिती नसल्यामुळे भविष्यातही जगाची संरचना पुरुषांनी पुरुषांसाठी निश्चित केलेली असेल, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
विज्ञान आणि नवोन्मेषामुळे जीवन बदलून टाकणारे फायदे मिळू शकतात ही वस्तुस्थिती नजरेआड करून चालणार नाही. विशेषतः दुर्गम भागात राहणाऱ्या मुलींचे विश्व यामुळे पूर्ण बदलू शकते. जर आपल्याला मुलींना 21 व्या शतकातील प्रचंड मोठी आव्हाने पेलण्यासाठी सक्षम करायचे असेल तर त्यांना त्यांच्या आवडीनुरूप विषय निवडण्याची संधी देणे अतिशय आवश्यक आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीने लागोपाठ सहा वर्षे इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांचा अभ्यास केला आणि त्यांना असे आढळून आले की, उच्च शिक्षणात विज्ञान विषयात लैंगिक विषमतेमुळे योग्यता मागे पडते. कारण जेव्हा संशोधकांनी गणित विषयाची परीक्षा घेतली तेव्हा मुले आणि मुलींची योग्यता समसमान असल्याचे आढळून आले.
अशी समानता असूनसुद्धा मुले स्वतःला गणितात अव्वल मानतात, तर मुली स्वतःलाच कमी लेखतात. मनात आणि मेंदूवर एखादी गोष्ट सातत्याने आदळली तर ती खरी वाटू लागते आणि आजन्म खरी वाटत राहते या संशोधनाला या वास्तवामुळे पुष्टी मिळते. “ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट’च्या अध्ययनात असे आढळून आले आहे की, पालक आपल्या मुलींना विज्ञान विषय घेण्यापासून केवळ परावृत्तच करतात असे नाही तर विज्ञान आणि गणित यांसारखे विषय मुलींसाठी नसतात, असे त्यांच्या मनावर वारंवार बिंबवण्याचे काम करतात. वास्तविक, विज्ञान विषयाचा जैविकतेशी काहीच संबंध नाही.
आणखी एका अध्ययनामधून असे दिसून आले आहे की, आपल्या लिंगानुरूप (जेंडर) आपल्याकडून कशा प्रकारचे वर्तन अपेक्षित आहे, याची समज पाच वर्षांच्या मुलांमध्येच विकसित झालेली असते. एका प्रयोगादरम्यान लहान मुलांना दैनंदिन कामांशी संबंधित काही चित्रे दाखविण्यात आली. त्यातील एका चित्रात एक मुलगी कुऱ्हाडीने लाकूड तोडताना दिसत होती. नंतर सर्व मुलांना विचारले गेले की, त्यांनी चित्रात काय-काय पाहिले? त्यावेळी अनेक मुलांनी असे उत्तर दिले की, चित्रात एक मुलगा कुऱ्हाडीने लाकूड तोडत होता. मुलगीही लाकूड तोडू शकते हे त्यांच्या पूर्वाग्रहांनी व्यापलेल्या मेंदूला जाणवणेही अशक्य होते.
मुलींच्या क्षमता पितृसत्ताक व्यवस्थेपुढे नेहमीच सवाल उपस्थित करतात. मुलींचे शिक्षण हा त्यांच्या स्वाभिमानाचा अविभाज्य भाग बनविण्याचे काम जेव्हा पालक करतील तेव्हाच हे चित्र बदलेल. त्याचप्रमाणे शिक्षकांच्या प्रशिक्षणातही अभिनव आणि लैंगिक भिन्नता आणि गरजा समजून घेणाऱ्या तंत्रज्ञानात गुंतवणूक केली जाईल, तेव्हाच सध्याचे कल बदलू शकतील.