जिल्ह्यात नोकरीचे आमिष दाखवून लुटणाऱ्या टोळ्या सक्रिय : वर्षाकाठी 40 लाखांची फसवणूक
संभाजी गोरडे
रांजणगाव गणपती – जिल्ह्यातील रांजणगाव गणपती, चाकण, बारामती, पिंपरी- चिंचवड औद्योगिक वसाहतीमध्ये एकीकडे मंदीचे वारे वाहू लागले आहे. त्यात बेरोजगार तरुण- तरुणींना जाहिरातीच्या माध्यमातून फसविले जात आहे. राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून रक्कम लुटली जात आहे. ही टोळी राज्यभर सक्रिय असल्यामुळे याची पाळेमुळे खोलवर रुजली आहेत. या टोळीकडून वर्षांकाठी सुमारे 40 लाख रुपयांची फसवणूक केली जात असल्याचे समजते. मात्र, हा प्रकार सुरू असताना रांजणगाव पोलिसांनी नुकताच एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. मात्र, ही कारवाई हिमनगाचे टोक समजले जात आहे. तरूण- तरूणींची फसवणुकीचा भूलभुलैय्या सुरू झाला आहे.
राज्यभरात एसटी आणि सार्वजनिक ठिकाणी तसेच पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात जाहिरात प्रसिद्ध केल्या जातात. नोकरीची आस असलेल्या तरुण-तरुणी या टोळीच्या जाळ्यात अलगदपणे सापडत आहेत. रांजणगाव वसाहतीमध्ये बहुराष्ट्रीय कंपन्या कार्यरत आहेत. या कंपन्यांच्या नावाने विविध महाराष्ट्रभर जाहिरात देऊन या बेरोजगार तरुणांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे. मोठ्या कंपन्यांची नावे घेऊन कामाला लावतो, असे अमिष दाखवून नोकरीचा भूलभुलैय्या दाखविला जात आहे. या टोळीशी संपर्क साधल्यानंतर बेरोजगार तरुणांना आधी पुण्यात उतरण्यास सांगितले जाते. तेथे ऑफिसमध्ये पैसे भरण्यास सांगितले जाते.
बेरोजगारांकडून दीड हजार ते 15 हजार रुपयांपर्यंत उकळले जात आहे. तिथून रांजणगावला आल्यावर संबंधित टोळक्यातील काही तरुण त्यांना मोठ्या कंपन्यांच्या गेटच्या जवळपास बोलावून घेतात. त्यांच्याकडून अधिक स्वरूपात रक्कम उकळली जात आहे. काहीवेळा बेरोजगार तरूणांना दमदाटी करून रक्कम वसूल केली जात आहे. या बेरोजगार तरुणांना त्याठिकाणी दुसरीकडे कामाला लावले जाते. त्यावेळेस या तरुणांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते. मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. आयटीआय, बीए, बीकॉम, बीएस्सी, इंजिनिअर आदी उच्चशिक्षित तरुणी जाहिरातींना बळी पडल्या आहेत.
रांजणगाव येथील औद्योगिक वसाहतीमध्ये नोकरीच्या शोधात आलेल्या कामगारांना लुटण्याचे काम करणाऱ्या एका टोळीचा रांजणगाव पोलिसांनी बंदोबस्त केला आहे. एमआयडीसी परिसरात व पुणे जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यभरात बेरोजगार तरुणांना लुटणाऱ्या या टोळ्या कार्यरत आहेत.
रांजणगाव औद्योगिक वसाहतीसह पुणे जिल्ह्यात चाकण, बारामती, पिंपरी- चिंचवड औद्योगिक वसाहतीमध्ये हा प्रकार सर्रास सुरू आहे. रांजणगाव पोलिसांनी गेल्या आठवड्यामध्ये बेरोजगार तरुणांना लुटणाऱ्या टोळीला ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली आहे. त्यामुळे या टोळीचे धाबे दणाणले आहे. तूर्तास या घटनांना आळा बसला आहे. मात्र, अशा टोळ्या पुणे जिल्ह्यात सक्रिय आहेत. त्यांच्यावर कायद्याचा बडगा उगारून बेरोजगारांना नोकरीच्या आमिषाने लुटणाऱ्या टोळ्यांचा बिमोड करणे गरजेचे आहे.
नामाकिंत कंपन्यांच्या नावाखाली लूट
रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये छोट्या-मोठ्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपनी कार्यरत आहेत. या कंपन्यांमध्ये कुशल- अकुशल अशा कामगारांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. मात्र, आजमितीस या बेरोजगार तरुणांच्या होत असलेल्या फसवणुकीमुळे रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील विविध कंपन्यांना व कंपन्यांमधील प्रामाणिकपणे काम करणाऱ्या ठेकेदारांना कुशल व अकुशल कामगार मिळणे जिकिरीचे ठरू लागले आहेत. या मिळालेल्या कामगारांना सर्व सुविधा देऊन त्यांना संरक्षण देण्याची जबाबदारीही सध्या ठेकेदार मंडळींना घ्यावी लागत आहे. नामाकिंत कंपन्याच्या नावाखाली फसवणूक केली जात आहे. याला आळा घालणे गरजेचे आहे.
40 लाखांवर रक्कम लुटली
जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये तरूण- तरूणींना नोकरी देण्याच्या नावाखाली फसवणूक केली जात आहे. यात ही टोळी तरबेज झाली आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील तरूण- तरूणी शिकार बनले आहेत. या आकर्षक जाहिरातीच्या भूलभुलैय्याला बळी पडल्यानंतर तरूण- तरूणी भानावर येत आहेत. जिल्ह्यात ही टोळी सक्रिय आहे. यात दहा ते पंधरा जणांचा ताफा असतो. यात गुंतलेले आणि बरबटलेले हात बेरोजगारांच्या स्वप्नांचा चुराडा करीत आहेत. टोळीचा नायनाट केल्याशिवाय बेरोजगारांना दिलासा मिळणार नाही. अन्यथा दरवर्षी 40 लाखांची फसवणूक करणारी सोनेरी टोळीचे आणखी फोफावल्याशिवाय राहणार नाही.