नवी दिल्ली – राज्यसभेचे अधिवेशन आज संस्थगित करण्यात आले.अधिवेशनाच्या नियोजीत कार्यक्रमानुसार उद्या 23 डिसेंबरला हे अधिवेशन संस्थगित होणार होते परंतु सततच्या व्यत्ययांमुळे ते आजच संस्थगित करण्याचा निर्णय अध्यक्ष व्यंकैया नायडू यांनी घेतला.
या अधिवेशनाचे कामकाज अपेक्षप्रमाणे झाले नाही त्याबद्दल नायडू यांनी सभागृहात खंतही व्यक्त केली. या अधिवेशन काळात विरोधकांनी सातत्याने व्यत्यय आणला त्या विषयीची आपली नाराजी स्पष्ट करून नायडू म्हणाले की याही पेक्षा अधिवेशनाचे कामकाज आपण चांगले करू शकलो असतो काय याचे सदस्यांनी आत्मपरिक्षण केले पाहिजे.
सभागृहाच्या कामकाज पद्धतीत नियम, बंधने आणि निर्धारीत प्रक्रिया नीटपणे पाळली गेली पाहिजे. सदस्यांनी सभागृहाची गरीमाही राखली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. देशाच्या हितासाठी आपण सभागृहात विधायक वातावरण तयार करण्याची आणि त्यासाठी एकमेकांशी अधिक समन्वयाने काम करण्याची गरज आहे असे त्यांनी नमूद केले.
सरकारने संसदेच्या मागच्या अधिवेशनातील गदारोळाचे कारण देऊन या अधिवेशनाच्या सुरूवातीच्या दिवशीच विरोधी पक्षाच्या बारा सदस्यांना सभागृहातून अधिवेशन काळापुरते निलंबीत केले आहे. सरकारची ही कृती बेकायदेशीर व घटना विरोधी असल्याचा आरोप विरोधकांनी सातत्याने केला.
हे निलंबन मागे घेण्याची मागणी विरोधकांनी सातत्याने केली पण सरकारने त्यांना धूप घातली नाही.त्यामुळे विरोधकही सभागृहात सातत्याने आक्रमक राहिले. त्यातून कामकाजात रोजच गोंधळाची स्थिती निर्माण होत गेली.