सातारा – स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या प्रतापगंज पेठ शाखेच्या पाच एटीम मशीन्समध्ये तांत्रिक बिघाड करून तब्बल दोन लाख 35 हजार रुपयांची रोकड हडपण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी चार अज्ञातांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाखा व्यवस्थापक संजय तुकाराम गव्हाळे यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्टेट बॅंकेच्या प्रतापगंज पेठ शाखेतीर पाच एटीएम मशीन्समधून चार जणांनी त्यांच्या बॅंक खात्यांमधील पैसे वेळोवेळी एटीएमची कॅशची शटर्स हाताने उचलली. त्यात तांत्रिक बिघाड केल्याने रक्कम निघाली; परंतु बॅंकेच्या सिस्टीमला काढलेल्या रकमांची नोंद झाली नाही. त्यामुळे आमचे पैसे निघाले नाहीत, असे सांगत संशयितांनी पैसे रिफंड मिळण्यासाठी स्टेट बॅंकेकडे तक्रार केली.
सिस्टीमला नोंद नसल्याने बॅंकेनेही संशयितांना काही रक्कम परत केली होती; परंतु हे प्रकार वारंवार घडल्याने बॅंकेच्या अधिकाऱ्यांना संशय आला. त्यांनी एटीममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पाहिले असता, संशयितांनी केलेला घोटाळा उघडकीस आला. हा प्रकार एका वर्षात दोन वेळा घडल्याने स्टेट बॅंकेच्या एटीएम मशीन्सच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.