राजगुरूनगर)- खंडेनवमी व दसऱ्याचे औचित्य साधून शनिवारी (दि. 24) राजगुरूनगर एसटी बस आगाराच्या मुंबई, नाशिक औरंगाबाद सातारा आदी ठिकाणी धावणाऱ्या बसेस सेवा सुरू करण्यात आल्याची माहिती राजगुरूनगर एसटी बस आगारप्रमुख रमेश हांडे यांनी दिली.
राजगुरूनगर आगाराचे प्रमुख रमेश हांडे यांनी सांगितले की, दसऱ्याच्या अगोदर खंडे नवमी निमित्ताने सर्व गाड्यांचे सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले आहे. गेल्या सात आठ महिन्यांपासून एसटीची सेवा बऱ्याचअंशी बंद होती. मात्र, काहीदिवसांपासून ग्रामीण भागात एसटीची सेवा हळूहळू सुरु केली आहे. तिला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, लांबपल्याची सेवा बंद आहेत. त्या शनिवारपासून सुरु करण्यात आल्या आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, बार्शी, सातारा, पंढरपूर, मांढरदेवी आदी ठिकाणी बस सेवा सुरू केली आहे. प्रवाशांची गैरसोय पाहून शासनाने बसेस सुरू करण्यास परवानगी दिली आहे.लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनाही प्रवास करता येणार आहे. दिवाळी सणासाठी शहरातून गावाकडे येणारे आणि जाण्यासाठी जास्तीत जास्त एसटी बसनेच प्रवासी प्रवास करतात.
राजगुरूनगर आगाराच्या वतीने आज पासून खंडेनवमी व दसऱ्याचे औचित्य साधून मुंबई सेंट्रल, अंधेरी, कुर्ला नेहरूनगर, बोरिवली, औरंगाबाद, पैठण, बार्शी, पंढरपूर, मिरज या मार्गावर नियमित बसेस सुरू केल्या आहेत. तसेच प्रवाशांनी दिवाळी सणासह इतरवेळी एसटीने सुखकर प्रवास करावा असे आवाहन महामंडळाच्या वतीने व खेड आगाराच्या वतीने करण्यात आले आहे.
राजगुरूनगर आगारातील सर्व गाड्या स्वच्छ करून धुवून आणि निर्जंतुकीकरण करूनच पाठविण्यात येत आहेत. मुंबई, नाशिक, औरंगाबाद आदी लांबपल्याच्या गाड्या सुरु झाल्याने नागरिकांनी दिवाळी सणाच्या निमित्ताने एसटी बसने सुरक्षित प्रवास करावा. समाजातील सर्व घटकांना पूर्वी होता त्याच दराने एसटीचा प्रवास करता येणार आहे, असं आगार प्रमुख रमेश हांडे यांनी सांगितलं आहे.