केंदूर – केंदूर भागासह संपुर्ण शिरूर तालुक्यात पावसाने ओढे-नाले, बंधारे, रस्ते फुटून वाहून गेले, अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. याबाबत दैनिक प्रभातने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत बुधवारी (दि. 21) केंदूर, करंदी, पाबळ परिसरात प्रांताधिकारी संतोष कुमार देशमुख यांनी पाहणी दौरा केला.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पंचनामा केला जाईल. त्याचबरोबर हा संपूर्ण अहवाल शासनाकडे पाठवला जाईल. शासन देणार असलेली मदत प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवली जाईल. यातून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची आम्ही खबरदारी घेणार आहोत, अशी ग्वाही प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी दिली.
पऱ्हाडवाडी आणि केंदूरच्या इतर भागात बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची देशमुख यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानीचा संपूर्ण आढावा घेतला शेतकऱ्यांशी संवाद साधला. बांधावर जाऊन पंचनामा करण्याच्या सूचना स्थानिक तलाठी व कृषी अधिकारी यांना दिल्या आहेत.
यावेळी पंचायत समितीच्या उपसभापती सविता पऱ्हाड, विठ्ठल पऱ्हाड, सुरेश उंद्रे, काळूराम दरेकर, मदन पऱ्हाड, सतीश पऱ्हाड, संतोष ढोकले, प्रवीण झेंडे, बापू दरेकर, संजय पऱ्हाड आदी शेतकरी उपस्थित होते.