रेडा -इंदापूर तालुक्यासह जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन आठ दिवस झाले तरीही शासनाने आपत्तीग्रस्तांना कोणतीही मदत दिलेली नाही. त्यामुळे शासनाने विलंब न लावता शेतकरी, व पूरग्रस्तांना 25 हजार रुपयांची तातडीची मदत द्यावी, अशी मागणी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली.
इंदापूर तालुक्यात यंदा आतापर्यंत विक्रमी 275 टक्के (एकूण 1450 मीमी) पाऊस झाला आहे. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील मका, बाजरी, कांदा, कडवळ आदी पिके पूर्णपणे वाया गेली आहेत. फळबागा व ऊस पिकांचेही नुकसान झाले आहे. अजुनही शेतात पाणी आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.
त्यामुळे तातडीची मदत म्हणून शेतकऱ्यांना आता 25 हजार रुपये प्रति हेक्टरीप्रमाणे मदत शासनाने करावी. त्यानंतर पिकांचे पंचनामे पूर्ण झाल्यावर फळबागा, ऊस पिकांना प्रति हेक्टरी 50 रुपये हजार निकषाप्रमाणे उर्वरित देय रक्कम 25 हजार रुपयांची आर्थिक मदत शेतकऱ्यांना द्यावी, असे पाटील यांनी नमूद केले.
ते म्हणाले, नीरा व भीमा नदीला पूर आल्याने तसेच गावोगावच्या ओढ्याचे रूपांतर नदीत झाल्याने अनेक घरांची हानी झाली आहे. त्यामुळे पूरग्रस्त कुटुंबांना तातडीची मदत म्हणून 25 हजारांची मदत द्यावी. पंचनामे झाल्यानंतर कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे नुकसानीच्या प्रमाणात 1 लाख व 2 लाख रुपये याप्रमाणे भरपाईची रक्कम अदा करावी, गावोगावची तसेच इंदापूर शहरातील दुकाने तसेच हॉस्पिटल्समधील उपकरणांचे नुकसान झाल्याने त्यांनाही मदत करावे, नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत, एकही शेतकरी अथवा नागरिक पंचनाम्यापासून वंचित राहू नयेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
नीरा व भीमा नदीवरील बहुतेक बंधाऱ्यांचे नुकसान झाले आहे. बंधाऱ्यांची तात्काळ दुरूस्ती करून पूर्ण क्षमतेने पाणी अडविण्यात यावे. नाही तर नदी काठच्या शेतकऱ्यांची पिके 15 जानेवारीपासून पाण्याअभावी जळून जाऊन शेतकरी उद्ध्वस्त होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
चालू रब्बी हंगामातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15 हजार रूपयांचे अनुदान शासनाने देण्याची गरज आहे. विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
मात्र, पूरग्रस्तांना मदत करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. इंदापूरचे लोकप्रतिनिधी हे बांधकाम खात्याचे मंत्री आहेत, असे असताना त्यांच्या निष्क्रियतेमुळे गावोगावच्या रस्त्यांची वाट लागली आहे. हे लोकप्रतिनिधी निष्क्रिय व अपयशी ठरले आहेत, अशी टीका त्यांनी केली.
सोलापुरात धनादेश वाटप, इंदापुरात का नाही
इंदापूरचे लोकप्रतिनिधी हे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, तिथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अतिवृष्टीने घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांना शासनाच्या वतीने धनादेशाचे वाटप करण्यात आले. आपले लोकप्रतिनिधी सोलापूर येथे शासनाची तात्काळ मदत म्हणून जनतेला धनादेशवाटतात. मात्र, इंदापूर तालुक्यातील जनतेला वाऱ्यावर सोडत आहेत. तसेच सोलापूरच्या तुलनेत इंदापुरात जास्त नुकसान झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी इंदापूर तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करणे गरजेचे होते, असे स्पष्ट मतही पाटील यांनी व्यक्त केले.