भोर -भोर तालुक्यात मंगळवार (दि. 13) पासूनच पावसाने हजेरी लावली असून, आज (दि. 14) सकाळपासूनच हवेत गारवा निर्माण झालेला आहे. आभाळ ढगांना व्यापले आहे आणि दुपारपासून पावसाची संततधार सुरू झाली आहे.
तालुक्यातील आंबवडे, हिर्डोशी, आंबाडे, महुडे, पसुरे, भुतोंडे खोऱ्यात या संततधार पावसाने ओढे, नाले दुथडी भरून वाहत असून नीरा नदीच्या पात्रातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे भाटघर धरणातून 1400 क्युसेक, तर वीर धरणातून 23185 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला असून, पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो. नीरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या 13 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टीची शक्यता वर्तवली असल्याने भोरचे प्रशासन अलर्ट झाले आहे. अतिवृष्टीच्या काळात नागरीकांनी सावधान राहण्याचे आवाहन भोरचे तहसीलदार अजित पाटील यांनी केले असून, तहसीलदार कार्यालयातील दक्षता विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
या संतत धार पावसाने भात पिकाची खाचरे तुडुंब भरली असून, भात पिकाला याचा फायदा झाला असला, तरी हातातोंडाशी आलेल्या या पिकास आणि काढणीस आलेले सोयाबिन, तीळ, भुईमूग, इतर कडधान्याचे नुकसान होत असल्याने बळीराजा चांगलाच धास्तावला आहे.
पुढील चार दिवस विजांच्या कडकडाटासह व मोठ्या पावसाचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला असून वादळ व पावसात विजेचे खांब, वाहिनी पडण्याची शक्यता असते, अशा वेळी त्यास स्पर्श करू नये, जवळ जाऊ नये, त्याबाबत माहिती महावितरणच्या कर्मचाऱ्यांना अथवा अधिकाऱ्यांना माहिती द्यावी किंवा खानापूर उपकेंद्रातील तात्पुरते नियंत्रण कक्ष (मोबाइल क्र. 7875815028) येथे संपर्क साधावा.
भोर महावितरणचे सर्व कर्मचारी व अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. मात्र या नैसर्गिक आपत्तीच्या काळात महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन भोरचे महावितरणचे साहायक आभियंता संतोष चव्हाण यांनी केले आहे.