हाथरस – देशभरात सनसनाटी निर्माण करणाऱ्या उत्तरप्रदेशातील हाथरस प्रकरणाचा तपास सीबीआयने सुरू केला आहे. त्याचाच भाग म्हणून सीबीआयच्या पथकाने पीडितेच्या कुटुंबियांचा जबाब नोंदवून घेतला. तसेच, गुन्हा घडलेल्या ठिकाणाची पाहणी केली.
हाथरसमधील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाने देशभरात संतापाची लाट उसळली. त्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. त्याप्रकरणी दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल केल्यानंतर सीबीआयचे पथक हाथरसमध्ये दाखल झाले.
पीडितेच्या घरी जाऊन त्या पथकाने कुटुंबियांकडून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सीबीआयचे पथक जबाब नोंदवून घेण्यासाठी पीडितेच्या भावाला समवेत घेऊन गेले. त्यामुळे त्याच्या अटकेच्या चर्चांना उधाण आले. मात्र, कुणालाही अटक करण्यात आलेली नसल्याचे सांगत सीबीआयने त्या चर्चांना पूर्णविराम दिला.
सीबीआयच्या मदतीसाठी न्यायवैद्यक तज्ञांचे पथकही धाडण्यात आले आहे. न्यायवैद्यक तज्ञांकडून गुन्हा घडलेल्या ठिकाणाचे तपशीलवार पृथक्करण केले जाईल. हाथरस प्रकरणी नवनवे दावे केले जात आहेत. त्याशिवाय, परस्पर विसंगत माहिती पुढे येत आहे. त्यामुळे प्रकरणाचे गूढ उकलण्याचे आव्हान सीबीआयसमोर आहे.