जालिंदर आदक
तळेगाव ढमढेरे – शिरूर तालुक्याच्या दक्षिण पट्ट्यातील शेतजमिनी नदीच्या पाण्यामुळे क्षारपड झाल्या आहेत. त्यामुळे येथील शेतकरी तरकारीसह इतर पिके सोडून ऊस पिकाकडे वळला आहे. कारण इतर पिके घेतल्यास किटक आणि रोगराईला सामोरे जावे लागत आहे, त्यामुळे सध्या तरकारी पिकांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असल्याचे दिसून येत आहे.
शिरूर तालुक्यातील विठ्ठलवाडी, टाकळी भीमा, शिवतक्रार ही गावे भीमा नदीच्या काठालगत आहेत. बाराही महिने नदीला मुबलक पाणी असते. त्यामुळेच येथील जमिनी क्षारपड झाल्या आहेत. येथील शेतकऱ्यांचा कल ऊस पिकाकडे जास्त आहे. डिंग्रजवाडीच्या 650 हेक्टर भौगोलिक क्षेत्रातील 420 हेक्टर ऊस लागवड झाली आहे.
धानोरे 665 हेक्टर भौगोलिक क्षेत्रातील हेक्टर 450 ऊस लागवड झाली आहे. विठ्ठलवाडीच्या 950 हेक्टर क्षेत्रातील 800 हेक्टर ऊस लागवड झाली आहे. टाकळी भीमाच्या 1800 हेक्टर भौगोलिक क्षेत्रातील 1000ते 1200 हेक्टर ऊस लागवड झाली आहे. तसेच शिवतक्रार म्हाळुंगीच्या 350 हेक्टर क्षेत्रातील 250 हेक्टर ऊसाची लागवड झाली आहे.
नदी काठच्या परिसरातील जमिनीतील आद्रता असल्याने ऊसाला पर्याय म्हणून दुसऱ्या पिकाकडे वळता येत नाही. या पिकांमध्ये किडरोगाचे प्रमाण जास्त असते. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय सरासरी 90 टक्के शेतकरी करत असतात. शेतात जाण्या-येण्याची रस्त्याची सोय असणारे शेतकरी थोड्या प्रमाणात तरकारी पिके घेतात.
गेल्या सहा वर्षांपूर्वी येथील शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी चंदननगर किंवा पुणे येथील गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये जावे लागत असे, आता शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढाकार घेऊन पिंपळे जगताप मार्केट यार्डचा पर्याय मिळवून दिला. तरीही शेतातून पिके काढण्यासाठी रस्त्याबरोबर इतर मुलभूत सोयीसुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध होत नाही.
बाजार पेठ जवळ आहे थोड्या दिवसात नगद पैसे मिळून जातात. भांडवली खर्चही कमी येतो. तरीही ऊस पिकाकडे जास्त कल असतो. बागायती पट्ट्यात 100 टक्के पाणी फिरते. त्या ठिकाणी भाजीपाल्याला अडचण येते. उसाच्या पिकापेक्षा दुसरी पीके नफा मिळवून दतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या तरी फायद्याची पीके घेण्याची गरज आहे.
आंतर पिकामधूनही होऊ शकतो फायदा
याभागातील पिकांना रोगराई 50 टक्के वाढ असते. उसामध्ये आंतरपीक, नवनवीन प्रयोग, ठिबक सिंचन, रानाला विश्रांती, हिरवळीचे खते याचे नियोजन शेतकऱ्यांनी करायला हवे. उसाचे चार-पाच खोडवे घेण्यापेक्षा तीन पिकानंतर शेताला विश्रांती द्यावी विश्रांती मध्ये हिरवळीची पिके घ्यावी या भागात जास्त पाण्याचे प्रमाण असल्यामुळे कोरडे हवामान मिळत नाही परिणामी दुसरे पीक तग धरत नाही.