पिंपरी – माथाडी कामगारांचे दिवंगत नेते अण्णासाहेब पाटील यांची जयंती शुक्रवारी (दि. 27) पिंपरी-चिंचवड शहरात साजरी करण्यात आली. महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष इरफान सय्यद व माथाडी कामगारांच्या वतीने केएसबी चौकातील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले.
या वेळी कार्याध्यक्ष मोरे, सरचिटणीस प्रवीण जाधव, सल्लागार बाळासाहेब शिंदे, खंडू गवळी, मुरलीधर कदम, भिवाजी वाटेकर, मारुती कौदरे, सर्जेराव कचरे, संदीप मधुरे, पांडुरंग काळोखे, आबा मांढरे, सतीश कंठाळे, श्रीकांत मोरे, सुनील सावळे, गोरख दुबाले, शंकर शिंदे, गुलाब शिंदे, सोमा फुगे यांच्यासह पिंपरी चिंचवड व चाकण-तळेगाव एमआयडीसीमधील माथाडी कामगार उपस्थित होते.
इरफान सय्यद म्हणाले की, कष्टाची कामे करताना कामगारांना मिळणारा मोबदला आणि मालकांकडून होणारी पिळवणूक पाहून त्यांचे मन तळमळायचे. या तळमळीतूनच त्यांनी माथाडी कामगार चळवळीचा लढा सुरू केला. तत्कालीन लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करून माथाडी कायदा आमलात आणला. त्यांच्या महान कार्यामुळेच आज माथाडी संघटना एक बलाढ्य संघटना म्हणून ओळखली जात आहे. याचे खरे श्रेय त्यांनाच जाते. अण्णासाहेब पाटील यांनी लाखो कष्टकरी, मालवाहू,माथाडी कामगारांना ताठ मानेने जगायला शिकविले. माथाडी कामगारांनी याची जाणीव ठेवून त्यांचा लढा पुढे तेवत ठेवण्याचे महान कार्य केले पाहिजे.