हर्षद कटारिया
सहकारनगर, दि 24 – अंबिल ओढ्याला मागील वर्षी 25 सप्टेंबर2019ला पूर येऊन मोठी दुर्घटना घडली होती. कात्रज, सातारा रस्ता, सहकारनगर, पद्मावती, ट्रेझर पार्क, टांगेवाला कॉलनी, तावरे कॉलनी, दांडेकर पूल परिसरातील घराचे नुकसान होऊन मोठी हानी झाली होती. या दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत असताना अद्याप कुठलेही सुरक्षात्मक उपाय येथे करण्यात आलेले नाहीत. पालिका प्रशासन निद्रीतावस्थेत असल्याचा आरोप दुर्घटनाग्रस्त करीत आहेत.
आंबील ओढा पुरग्रस्तांना आजही ती काळ रात्र आठवली तरी मनात धडकी भरते. दुर्घटनेनंतर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून अनेक आश्वासने देण्यात आली. परंतु, कोणलाही काहीही देणे-घेणे नाही, अशीच सध्याची येथील अवस्था आहे. दुर्घटनेनंतर सर्वच पातळींवर प्रशासन कुचकामी ठरले आहे. या दुर्घटनाग्रस्तांना सुरक्षित जागी घरे देण्याचा प्रस्ताव लालफितीत अडकला आहे. ओढ्याचे खोलीकरण आणि रुंदीकरणही संथगतीने सुरू आहे. ओढ्यालगतच्या सोसायट्यांच्या सुरक्षा भिंतींचा प्रश्न सुटलेला नाही.
ओढ्यात मोठ्या प्रमाणात आजही राडारोडा पडून आहे.
धोकादायकरित्या अतिक्रमणे पुन्हा उभी राहिली आहेत. गेल्या वर्षभरात या प्रश्नावर पालिका प्रशासनाने चर्चाच केली नसल्याने, याबाबतचे गांभीर्य लक्षात येते. याउलट या ओढ्यातील राडारोडा काढण्यावर पालिका प्रशासनाकडून कोट्यवधी खर्च करण्यात आल्याची चर्चा असताना याचा हिशेब देण्याचे धाडस कोणत्याही लोकप्रतिनिधींकडे नसल्याने दुर्घटनाग्रस्तांत प्रशासनाविषयी तिव्र संताप आहे.
प्रतिक्रिया —
दुर्घटनाग्रस्तांना त्यांची हक्काची घरे मिळालेली नाहीत. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आश्वासन दिले होते ते अजूनही वर्षभरानंतर पूर्ण झालेले नाही.
राज्य सरकार बदलले तरी परिस्थिती तीच आहे. नैतिक जबाबदारी घेऊन काम करण्यास राज्यकर्ते व प्रशासन अपयशी ठरले आहे.
– जयराज लांडगे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
———–
स्थानिक आमदारांच्या पाठापुराव्यामुळे 152 लाभार्थी असलेल्या कुटुंबांना हक्काचे घर मिळणार आहे. प्रकल्पासाठी एस.आर.ए. व पालिकेने परवानगी दिली असून जिल्हाधिकारी व प्रांतांची परवानगी मिळणे बाकी आहे. सदर कामासाठी पाठपुरावा सुरू आहे. ट्रेजर पार्क जवळ सुरक्षाभिंत बांधली असून राडारोडाही काढला आहे. ओढ्यालगतची काही अतिक्रमणे राजकीय हस्तक्षेपामुळे निघत नाहीत.
– महेश वाबळे, नगरसेवक, भाजप
———–
मागील वर्षी दुर्घटनेनंतर राजकीय मंडळी आली तसेच शासकीय अधिकारीही आले. त्यांनी फक्त पाहणी केली, अश्वासने दिली. पुढे काहीच झाले नाही. आजही ओढ्यालगत राहणाऱ्या लोकांचा जीव धोक्यात आहे. नालेसफाई झालेलीच नाही. नालेसफाईसाठी खर्च करण्यात आलेले कोट्यवधी रुपये कुठे जातात हा प्रश्न पडतो.
– सुभाष जगताप, नगरसेवक राष्ट्रवादी
———–
पूर परिस्थितीनंतर पाहणी करण्याचे काम प्राईम मुव्ह संस्थेला देण्यात आले. मात्र, त्या संस्थेने दिलेल्या कोणत्याही उपाययोजना अमलात आणल्या गेलेल्या नाहीत. आजही परिस्थिती जैसे थे आहे. ओढ्या लगतच्या घरांचे पुनर्वसन केलेले नाही. लोक जीव मुठीत घेऊन राहत आहेत. पालिकेत अनेक कामांवर कोटीची कोटी उड्डाणे होतात. पण, याकामासाठी पालिकेकडे निधी नसतो. हे खेदजनक आहे.
– अश्विनी कदम , नगरसेविका राष्ट्रवादी
———–
टक्केवारी संस्कृतीत माणुसकीही घटली असल्याचे सिद्ध होते. या दुर्घटनेनंतर ओढ्यातील गाळ काढण्यासाठी हजारो गाड्या लावल्या असल्याचे सांगितले जाते. गाळ मात्र तसाच आहे. पुणे मनपाने या गाड्यांचा खर्च लावला असेल तर नक्कीच माणुसकी लयाला गेली आहे, असेच म्हणावे लागेल. पुणेकर अशा कारभाऱ्यांना लक्षात ठेवतील
– सचिन शिंगवी, सामाजिक कार्यकर्ता
———–
आंबील ओढ्याच्या दुर्घटनंतर प्रशासनाचा ठिसाळ कारभार उघड झाला आहे. यावेळी मदतीसाठी सामाजिक संघटना काही मंडळे पुढे आली. परंतु, प्रशासन मात्र अद्यापही स्वत:ची जबाबदारी झटकत आहे.
नाले सफाई तसेच अन्य कामे झाली नसतील तर पुन्हा धोकादायक स्थितीची शक्यता नाकारता येत नाही.
– भरत सुराणा , पर्यावरण प्रेमी