नवी दिल्ली – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीनचे संरक्षण मंत्री वेई फेंघई यांच्याशी झालेल्या चर्चेवेळी ठामपणे भारताची भूमिका मांडली. चीनने प्रत्यक्ष ताबा रेषेचा (एलएसी) आदर राखावा. एलएसीची जैसे थे स्थिती बदलण्याचा एकतर्फी प्रयत्न करू नये, असे राजनाथ यांनी वेईंना सुनावले.
चीनी कुरापतींमुळे चार महिन्यांपासून सीमेवर म्हणजेच एलएसीलगत तणावाची स्थिती आहे. तणाव निर्माण झाल्यानंतर राजनाथ आणि वेई यांच्यातील चर्चेच्या रूपाने भारत आणि चीनमध्ये पहिलीच उच्चस्तरीय बैठक झाली. रशियाची राजधानी मॉस्कोत शुक्रवारी झालेली ती बैठक तब्बल 2 तास 20 मिनिटे चालली. त्यावेळी भारत आपले सार्वभौमत्व आणि क्षेत्रीय अखंडतेचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे राजनाथ यांनी ठणकावून सांगितले.
सध्याची स्थिती जबाबदारीने हाताळायला हवी. सीमा भागांतील स्थिती आणखी बिघडवणारी किंवा तणाव वाढवणारी कृती दोन्ही बाजूंकडून होऊ नये. मोठ्या संख्येने सैन्याची जमवाजमव, आक्रमक वर्तणूक, जैसे थे स्थिती बदलण्याचा प्रयत्न यांसारख्या चीनी सैनिकांच्या कृती द्विपक्षीय समझोत्यांच्या उल्लंघन करणाऱ्या आहेत. एलएसीलगतचा तणाव संपुष्टात येऊन शांतता प्रस्थापित होण्यासाठी ठरल्याप्रमाणे चीनने पूर्ण सैन्यमाघार घ्यावी. त्याशिवाय, दोन्ही देशांनी लष्करी आणि राजनैतिक स्तरांवरील चर्चा सुरूच ठेवायला हवी, असेही राजनाथ यांनी नमूद केले.
तणावानंतर भारत आणि चीनमध्ये लष्करी आणि राजनैतिक स्तरांवर चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. चर्चेवेळी सैन्यमाघारीबाबत दिलेला शब्द चीन पाळत नसल्याचे दिसून आले आहे. मागील आठवड्यात चीनी सैनिकांनी पुन्हा भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पूर्व लडाख भागातील तणावात आणखीच भर पडली. त्यापार्श्वभूमीवर, दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांमध्ये चर्चा होण्याच्या घडामोडीला महत्व आहे. ती चर्चा चीनी संरक्षण मंत्र्यांच्या विनंतीवरून झाली.