चातुर्मासात अनेक प्रासंगिक व्रतवैकल्ये येतात, त्यातील हरितालिका व्रत हे एक श्रेष्ठ व्रत आहे. हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेस केले जाते. या व्रतासंदर्भात असे सांगितले जाते की, भगवान महादेव हेच आपल्याला पती म्हणून लाभावेत, म्हणून सती पार्वतीने हेच व्रत केले होते. त्यामुळे मुली, उपवर कन्या आणि महिलावर्ग हा आपल्याला मनासारखा पती लाभावा. त्यास उत्तम आरोग्य लाभावे. आपले वैवाहिक जीवन हे सुखासमाधानाचे व्हावे या हेतूने हे व्रत करतात.
या व्रताचा महिमा आणि त्याची थोरवी त्या व्रताच्या व्रतकथेत आलेली आहे. ती अशी की, एकदा शिवपार्वती हे सुखसंवाद करीत असताना सती पार्वतीने त्यांना असा प्रश्न विचारला की “”स्वामी! माझ्या हातून असे कोणते पुण्यकारक व्रत घडले, की ज्यामुळे मला आपल्या सारखा पती मिळाला?”
तेव्हा भगवान शंकर म्हणाले, “”हे देवी! गतजन्मी तू जेव्हा उपवर झालीस तेव्हा तुझा पिता हिमालय ह्यास तुझा विवाह कोणा योग्य अशा पुरुषाबरोबर लावून द्यावा? ह्याची चिंता लागली होती. तेव्हा त्यांस नारदमुनींनी तुझा विवाह भगवान विष्णू ह्यांच्याशी लावून द्यावा असा सल्ला दिला होता.
पण तुझ्या मनात सदैव माझेच ध्यान, मनन आणि चिंतन चाललेले होते. तेव्हा तू मीच तुला पती स्वरूपात लाभावे म्हणून गृहत्याग करून एका गुहेत शिवलिंगाची स्थापना करून त्यासमोर माझी कठोर तपसाधना करीत बसलीस. तुझ्या तपाचा काळ पूर्ण होताच मी तुझ्यावर प्रसन्न होऊन तुला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले.
तेव्हा तू “तुम्ही मला पती म्हणून जन्मोजन्मी लाभावेत’, असा वर मागितलास. मी “तथास्तु’ असा आशीर्वाद दिला. तुझ्या पित्यानेही तुझी माझ्यावरील भक्ती पाहून त्यांचे मनपरिवर्तन झाले. त्यांनी तुझा विवाह माझ्याशी लावून दिला.
अशाप्रकारे तुला जी पूजा करून माझी प्राप्ती झाली. ते पूजन हे “हरितालिकेचे पूजन’ होते. मी तुला दर्शन आणि शुभाशीर्वाद दिलेला दिवस हा “भाद्रपद शुद्ध तृतीये’चा होता. त्यामुळे ज्या कोणी उपवर कन्या हे व्रत, उपवास, जागरण आणि उपासना करतात, त्यांना त्यांच्या मनासारखा पती लाभून त्यांचे वैवाहिक जीवन सुखी समाधानाचे होते.
गेल्या अनेक पिढ्यांपासून हे व्रत करण्याची परंपरा आपल्या संस्कृतीमध्ये आज पर्यंत टिकून आहे आणि ती तशीच पुढेही राहीलच.
– अरुण गोखले