नवी दिल्ली – या वर्षभरात देशभरातील जवळपास 179 महाविद्यालये बंद पडली, अशी माहिती “ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन’ने दिली आहे. 2020-21 या शैक्षणिक वर्षात बंद पडलेल्या महाविद्यालयांमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालये आणि व्यावसायिक शिक्षण संस्थांचा समावेश आहे.
देशभरातील 179 शिक्षण संस्था बंद पडल्या. तर गेल्या 5 वर्षात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांच्या जागा शिल्लकच राहात असल्यामुळे जवळपास 134 शिक्षण संस्थांनी यावर्षी अभ्यासक्रमांसाठी मंजुरीही मागितलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कमी संख्येमुळे शिक्षण संस्था सुरू ठेवणेच शक्य होत नाही आहे.
तांत्रिक शिक्षण नियामकांनी दंडात्मक कारवाई केल्यामुळे किमान 44 संस्थांना मान्यता मिळू शकली नाही किंवा त्यांना दिलेली मान्यता मागे घेण्यात आली. 2019-20 या शैक्षणिक या वर्षामध्ये 92 तांत्रिक शिक्षणसंस्था बंद कराव्या लागल्या. याचप्रमाणे 2018-19 मध्ये 89, 2017-18 मध्ये 134, 2016-17 मध्ये 163, 2015-16 मध्ये 126 आणि 2014-15 मध्ये 77 तंत्रशिक्षण संस्था बंद पडल्या होत्या.
विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षात प्रवेश देण्यास शिक्षण संस्था असमर्थ ठरल्या तर ती शिक्षण संस्था बंदच करावी लागते. मात्र सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत शिक्षण संस्थेतील त्यांचा प्रवेश कायम राहतो.
अधिकृत आकडेवारीनुसार, जागा कमी झाल्यामुळे किंवा विशिष्ट अभ्यासक्रम किंवा विभाग बंद झाल्यामुळे 762 महाविद्यालयांमधील 89 हजारापेक्षा जास्त जागा कमी झाल्या आहेत.
फार्मसी आणि आर्किटेक्चरच्या महाविद्यालयांवर संक्रांत… 2020-21 शैक्षणिक वर्षात फार्मसी आणि आर्किटेक्चर संस्थांमध्ये “एआयसीटीई’ने मंजूर केलेल्या एकूण 1.09 लाख जागा कमी करण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या नुकत्याच दिलेल्या निकालानुसार, नवीन आर्किटेक्चर आणि फार्मसी महाविद्यालये सुरू करण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2020 -2021 पासून केवळ “कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर’ आणि ‘फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया’ची मंजुरी अनिवार्य असेल, वरिष्ठ “एआयसीटीई’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. परिणामी “एआयसीटीई’ची मान्यता अनिवार्य नसणार आहे. यामुळे अनेक महाविद्यालयांनी “एआयसीटीई’कडून मान्यता आणि मंजूरी मागे घेतली असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात जागाही कमी झाल्या आहेत.