नवी दिल्ली – केंद्र सरकार भारतीयांच्या व्यक्तिगत माहितीबाबत कुठलीही तडजोड खपवून घेणार नाही, असे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे. देशात 59 चिनी मोबाईल ऍपवर सरकारने अलीकडेच बंदी घातली आहे, त्यासंदर्भात ठाकूर प्रसाद स्मृती व्याख्यानात दूरदृश्य प्रणालीद्वारे केलेल्या भाषणात त्यांनी हे प्रतिपादन केले.
भारतीयांविषयीची माहिती ही भारतीयांच्या स्वतःच्या मालकीची आहे. त्यामुळे ही माहिती सुरक्षित ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारने डेटा संरक्षण कायदा तयार केला आहे. संसदीय समिती सध्या त्याचं परीक्षण करत असल्याचे प्रसाद यांनी सांगितले.
चिनी ऍप वर बंदी घातल्यामुळे भारतातील माहिती तंत्रज्ञांना संधी निर्माण झाली आहे, असेही प्रसाद यांनी भाषणात नमूद केले. डिजिटल इंडिया हा परिवर्तनात्मक कार्यक्रम ठरला असून त्यामुळे सर्वसामान्य भारतीय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सक्षम होत असल्याचेही ते म्हणाले.