सोलापूर: एकीकडे देशात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दुसरीकडे आयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाची तारीख नुकतीच जाहीर झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट’ला भूमिपूजन होणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.
“राम मंदिर बांधून करोना आटोक्यात येत असेल तर भूमिपूजन अवश्य करा,” असा टोला शरद पवार यांनी नरेंद्र मोदींना लगावला. राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सोलापूर जिल्ह्यात कोरोना दौरा करत आहे. त्यांच्यासोबत आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे देखील आहेत. दरम्यान, शरद पवार यांनी सोलापुरातील बैठक संपल्यानंतर पत्रकार परिषद घेतली.
शरद पवार म्हणाले, “करोना हे देशावरचे मोठे संकट आहे. त्यावर यशस्वीपणे मात करण्यासाठी राज्य व केंद्र सरकार एकत्रित आले पाहिजे. एकमेकांशी योग्य समन्वय साधून काम झाले पाहिजे. करोनाचे भयसंकट परतवून लावण्यासाठी कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचे, हे प्राधान्याने ठरविले पाहिजे. परंतू, मंदिर बांधून करोनाचं संकट दूर होईल, असं काही मंडळींना वाटतं आहे. राम मंदिर बांधून करोना आटोक्यात येत असेल तर भूमिपूजन अवश्य करा. फक्त करोनाचं संकट दूर व्हावं हीच आमची इच्छा आहे.”