नगर – प्रारंभीपासूनच ज्यांनी तपोवन रस्त्याच्या कामात आठकाठी आणली. त्यांना आता गुणवत्तेच्या नावाखाली गल्ला भरायचा आहे. वास्तविक रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याची तक्रार अगोदर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनीच केली होती. आता त्यातून केवळ राजकीय पोळी भाजून घेण्याचा माजी आमदारांचा प्रयत्न असल्याची टीका महानगरपालिका विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी आज केली.
तपोवन रस्त्याच्या मुद्यावर आज बारस्कर यांच्यासह कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी पत्रकारांशी संवाद केला. नगरसेवक कुमार वाकळे, विनीत पाऊलबुधे, सुनील त्रिंबके व डॉ. सागर बोरुडे, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, निखिल वारे आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ता मंजूर करुन आणण्याचे श्रेय आमदार संग्राम जगताप यांचेच आहे. माजी आमदारांनी हा रस्ता ग्रामसडक योजनेतून होवूच नये, यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी शिवसेनेच्याच जिल्हा परिषदेतील नेत्यांस पत्रव्यवहार करायला लावले. विशेष म्हणजे गेली पंचवीस वर्षे हा रस्ता खुलाच नव्हता. त्यावेळी मात्र ते गप्प बसले होते. त्यावेळी काम करण्यास त्यांना कोणी अडविले होते?, असा सवाल या नगरसेवकांनी केला.
आमदार जगताप यांनीच हा रस्ता खुला केला. पहिल्या टप्प्यात पाच लाख रुपये खर्चुन किमान वापराजोगा रस्ता जगताप यांनीच तयार केला होता. दरम्यान, या रस्त्याचे काम सुरु असताना ते निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे लक्षात आल्याने प्रभाग एक, दोन व सातमधील नगरसेवकांनी किमान आठ वेळा काम बंद पाडले होते. शिवाय आमदार जगताप यांनीच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे तक्रार केल्याने रस्त्याच्या तपासणीचे आदेश झाले असल्याचा दावाही बारस्कर यांच्यासह उपस्थित नगरसेवकांनी केला.
“ते’ जनाधार नसलेले नेते
महापौर असताना जे नगरसेवकपदाच्या निवडणुकीतून पळून गेले. ते जनधार नसलेले नेते आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या जीवावरच महापौर झाले होते. त्यांच्याकडून गैरकारभाराचे होणारे आरोप हास्यास्पद आहेत. ज्यांच्या त्यांच्या काळातच महापालिकेतील “बाबू’ लाचेच्या सापळ्यात अडकला. “बाबू’ कुणासाठी अडकला होता, हे नगरकरांना माहित असल्याची टीकाही बारस्कर यांनी केली.