सातारा – करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने सातारा जिल्हा परिषदेने सोमवारपासून (दि. 13) कार्यालयात लागू केलेल्या नियमावलीची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. महत्वाच्या कामासाठीच नागरिकांना प्रवेश देण्यात येत असून अधिकारी, कर्मचाऱ्यांचीही तपासणी करण्यात येत आहे.
करोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होत आहेत. जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये होणारी गर्दी पाहता नुकतीच जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी कडक नियमावली जाहीर केली.
त्यानुसार जिल्हा परिषदेची मुख्य इमारत आणि विस्तारित इमारतीमध्ये प्रवेश करण्यासाठी मुख्य इमारतीचा एकच मार्ग सुरू ठेवला आहे. पर्यायी सर्व मार्ग बंद ठेवले आहेत. सर्व खासगी वाहनांना बंदी करण्यात आली आहे. ओळखपत्र तपासूनच कार्यालयात प्रवेश दिला जात आहे. प्रवेशासाठी आणि बाहेर जाण्यासाठी एकच गेट सुरू ठेवले असून थर्मल तपासणी आणि सॅनिटायझर प्रवेशद्वारावरच बंधनकारक केले आहे.
प्रवेशद्वारातच तळमजल्यावर टपाल व्यवस्था करण्यात आली आहे. तालुका विभागाचे टपाल तेथेच देण्यात येत असून विविध कार्यालयाकडे येणारे पोस्टाचे टपाल तसेच अभ्यागतांनी समक्ष दिलेले अर्ज येथे स्वीकारण्यात येत आहेत. एखाद्या विभागात काही काम असेल तर कामाचे स्वरूप, विभागाचे नाव, दूरध्वनी क्रमांक इत्यादी मजकूर लिहून तो कागद प्रवेशद्वारावरील टपाल व्यवस्थेमध्ये जमा करण्यात येत आहे. त्या नागरिकाला त्याच्या कामासंदर्भात संबंधित अधिकारी आणि कर्मचारी दूरध्वनीद्वारे पाठपुरावा करत आहेत.
करोनाचा विविध शासकीय कार्यालयामध्ये शिरकाव झाला असल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून नियमावलीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. नागरिकांनी या सर्व नियमांची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन जाधव यांनी केले आहे.