मंचर -आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील नागरिकांना आलेली भरमसाठ वाढीव रकमेची विजबिले दुरुस्त करण्याची मागणी महावितरण कंपनीला निवेदनाद्वारे करण्यात आली आहे, अशी माहिती किसानसभेच्या वतीने देण्यात आली. वीजबिले कमी करुन घेण्यासाठी घोडेगाव येथील विभागीय कार्यालयात येण्यासाठी एसटी गाड्या बंद असल्याने मोठी गैरसोय होत आहे.
नागरिकांनी वीजबिले करण्यासाठी घोडेगाव येथे येण्याऐवजी संबंधित वीजबिल अधिकाऱ्यांनीच तळेघर, आडिवरे, तिरपाड या मध्यवर्ती गावांमध्ये वीजबिल दुरुस्तीचा कॅम्प घ्यावा. नागरिकांची वीजबिले कमी करुन द्यावीत. अशा मागण्यांचे निवेदन घोडेगाव येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयास दिल्याची माहिती, किसान सभेचे तालुका सचिव अशोक पेकारी, उपाध्यक्ष राजू घोडे, तालुकाध्यक्ष कृष्णा वडेकर, तालुका सहसचिव सुभाष भोकटे, दत्ता गिरंगे, लक्ष्मण मावळे व रामदास लोहकरे यांनी दिली.