ठाणे: विरोधकांना काय बोलायचंय ते बोलू द्या, सध्या करोनाच्या संकटाशी लढणे हीच आमची प्राथमिकता आहे. बाकीच्या सर्व गोष्टी नंतर, अशा शब्दांत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी सध्या राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत आहेत.
ठाणे महापालिकेत करोनाच्या परिस्थितीचा आदित्य ठाकरे यांनी नुकताच आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. आदित्य ठाकरे म्हणाले, विरोधकांना त्यांचं काम करू द्या, आम्ही आमचं काम करीत राहणार आहोत.
सध्या आमची प्राथमिकता ही करोनाच्या संकटाशी लढा देणे आणि संसर्ग वाढीची साखळी तोडणे हीच आहे. इतर बाबी आमच्यासाठी दुय्यम आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.