पुणे – राज्याच्या विधान परिषदेवर विविध विषयांतील तज्ज्ञ-अभ्यासकांची निवड व्हावी, यासाठी शहरातील काही स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येत, राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी विविध क्षेत्रांतील सहा विषय तज्ज्ञांची नावे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सूचवली. राज्यपालांनी आपल्या अधिकाराचा वापर करत, या सदस्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी या संस्थांच्या प्रतिनिधींनी केली आहे.
राज्यात पर्यावरणीय, संशोधनात्मक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतीक विषयातील प्रश्न मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांची गुंतागुंतही मोठी आहे. या समस्या-आव्हाने सोडविण्यासाठी, त्याबाबतीत योग्य ती ध्येय-धोरणे आखण्यासाठी राज्याच्या सर्वोच्च सभागृहात या विषयातील अनुभवी, अभ्यासू, नावीन्यपूर्ण गोष्टी आत्मसात करणारे, दूरदृष्टी असणाऱ्या व्यक्ती असणे महत्त्वाचे आहे. हीच बाब लक्षात घेत, राज्यातील विविध सेवाभावी संस्थांनी, पर्यावरण क्षेत्रातील तळमळीने कार्य करणाऱ्या व्यक्तींनी एकत्रित येवून सहा विषयतज्ज्ञांची नावे महामहीम राज्यपाल कोश्यारी यांना सूचवली आहेत.
यामध्ये पर्यावरणतज्ज्ञ-अभ्यासक डॉ. सचिन अनिल पुणेकर, हरित चळवळीतील सारंग यादवाडकर, माहिती अधिकार या विषयातील ज्येष्ठ तज्ज्ञ विवेक वेलनकर, भूवैज्ञानिक व जलअभ्यासक उपेंद्र धोंडे, प्राध्यापक व पर्यावरण चळवळीच्या क्षेत्रात दीर्घ अनुभव असणारे डॉ. अनुपम सराफ आणि जलभूवैज्ञानिक डॉ. हिमांशू कुलकर्णी यांच्या नावांची शिफारस केली आहे.
राज्यपालांनी कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता भारतीय घटनेच्या आर्टिकल 163 (2) व 171 (5) नुसार आपले अधिकार वापरून वर नमूद विषयतज्ज्ञांना राज्याच्या विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी, या संस्थांनी पत्राद्वारे केली आहे.