अकोले -आ. गोपीचंद पडळकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन केलेली टीका माझ्या मनाला दुःख देणारी आहे. सवंगप्रसिद्धीसाठी भडक बोलणे ही आता फॅशन झाली आहे. पवार हे एक देशव्यापी नेतृत्व असून, त्यांच्यावरची टीका ही दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री तथा भाजपचे नेते मधुकरराव पिचड यांनी दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राजूर येथील निवासस्थानी ते बोलत होते. आ. पडळकर यांनी पवार यांच्यावर टीका केल्याबाबत पत्रकारांनी पिचड यांना छेडले असता, ते म्हणाले, आपण भाजपत जरी गेलो असलो, तरी पवार यांना आपण जवळून पहिले आहे. त्यांचे सर्वसामान्य, शेतकरी, कामगार, कष्टकरी यांच्या सर्वांगीण विकासासाठीचे योगदान नाकारून चालणार नाही.
ते एक देशव्यापी नेतृत्व असून, स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. वसंत दादा पाटील, वसंतराव नाईक यांच्या नंतर शरद पवार यांचे नेतृत्व सर्व जाती-धर्मांना, सर्वांना बरोबर घेऊन राजकारण, समाजकारण करणारे राहिले. देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या नेतृत्वावर अतिशय छोट्या माणसांनी टीका करणे योग्य नाही. हे निषेधार्थ आहे.
मी राजकारणातून निवृत्त झालो असलो, तरी अशा घटनांनी मन व्यथित होते. आपण पवार यांच्याबरोबर अनेक वर्षे काम केले. त्यांच्यावर अशा प्रकारची टीका बऱ्याचदा झाली असेल, पण ते निश्चल आहेत. अशा प्रकारच्या टीकांनी ते कधीच अस्थिर झाले नाहीत. छोट्या कार्यकर्त्यांना माझ्या नेहमी सूचना असतात, मोठ्या माणसांवर बोलताना आपली कुवत पाहून मर्यादा पाळाव्यात, असेही पिचड यावेळी म्हणाले.
देशाच्या राजकारणात त्यांचे अनन्य साधारण असे महत्त्व असून टीका करणाऱ्यांनी त्यांच्या वयाचे भान ठेवावे. त्यांचे देशाच्या, राज्याच्या योगदानाची उंची पाहून बोलले, तर बरे होईल, असेही पिचड म्हणाले.