कोल्हापूर (प्रतिनिधी) – राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे देशाला समतेचा संदेश देणारे लोकराजे होते. राजर्षी शाहूंचे विचार आणि कार्य देशालाच नव्हे तर जगालाही प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 146 व्या जयंतीनिमित्त सतेज पाटील यांनी कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस या राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाला भेट देऊन अभिवादन केले. यावेळी ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, महापौर निलोफर आजरेकर अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा शाहू जयंती सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे सांगत पाटील म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी एकतेचा आणि समतेचा संदेश साऱ्या जगाला दिला. त्या काळात राजर्षी शाहूंनी आयसोलेशन हॉस्पिटलची मुहूर्तमेढ रोवली. अशा या कर्तृत्ववान लोकराजाचे स्मरण प्रत्येकानेच करणे काळाची गरज आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्याच्या कामासही गती दिली असून हे काम लवकरच पूर्ण होईल, असाविश्वासही त्यांनी व्यक्त केला. याकामी शासनाकडून आवश्यक मदत आणि सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.