कवठे -संपूर्ण राज्य करोनाच्या संकटांचा सामना करत असताना वाई तालुक्यातील रेशनदुकानदारांनी बेकायदेशीर संप पुकारल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहे. हा संप मोडून काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेऊन गावोगावच्या गावकामगार तलाठी आणि कोतवाल यांच्या मदतीने जून महिन्यातील धान्याचे वाटप करावे, अशी मागणी शिधापत्रिकाधारकांमधून होत आहे.
करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत कोणीही उपाशी राहू नये यासाठी राज्य सरकारने कोणाकडे रेशनिंग कार्ड असो किंवा नसो अगदी नोकरदारांच्या शुभ्र कार्डासह सर्वानाच मोफत आणि काहींना अल्प दरात रेशनिंग दुकानांमधून धान्य वाटण्याचे अधिकार तालुक्यातील तहसीलदारांना दिले होते. त्या पध्दतीने गेल्या अडीच महिन्यात वाई तालुक्यातील सर्वच नागरिकांना या शासनाच्या स्तुत्य उपक्रमाचा लाभ मिळाला. या योजनेमुळे हातावर पोट असलेल्या आणि ऊपासमारीसारख्या संकटांचा सामना करीत असलेल्या गरजू आणि गरीबांना याचा मोठा फायदा झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते.
1 जूनपासून या महिन्याचे धान्य नागरिकांना वेळेत वाटण्यासाठी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच वाईचे तहसीलदार रणजित भोसले यांनी रेशनिंग दुकानदारांना धान्याचा कोटा सुपूर्त केला होता. या मोफत धान्यवाटपाचा कार्यक्रम सुरु असतानाच राज्यातील काही दुकानदारांनी नागरिकांना धान्य न वाटताच ते परस्पर विकल्याच्या ऑनलाईन तक्रारीमध्ये तथ्य असल्याने प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी आलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेवून शहानिशा करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली सक्षम अधिकाऱ्यांची अनेक पथके नेमून रेशनिंग दुकानदारांच्या चौकशा सुरु झाल्या.
या चौकशीत अनेक दुकानदारांनी धान्याचा अपहार केल्याचे सिद्ध झाल्याचे आढळून आल्याने जिल्हाधिकारी यांनी धडक कारवाईचा बडगा उगारून धान्याचा काळाबाजार करणाऱ्या दुकानदारांची दुकाने बंद केली. तर अनेकांच्या अनामत रकमा जप्तही केल्या. या कारवाईमुळे राज्य जिल्हा व तालुक्यातील रेशनिंग दुकानदारांच्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
राज्य सरकारने लोकहितासाठी धडाकेबाज केलेल्या कारवाईचा राग मनात धरून रेशनिंग दुकानदारांच्या राज्यातील संघटना जाग्या होवून 1 जूनपासूनच बेकायदेशीरपणे संपाचे हत्यार उपसून शिधापत्रिका धारकांना वेटीस धरले आहे. त्यामुळे वाई तालुक्यातील रेशनिंग दुकानदारांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे.