पुणे – शहरात नालेसफाईची तब्बल 95 टक्के कामे झाल्याचा दावा महापालिका प्रशासन करत आहे. मात्र, ही कार्यवाही कागदावरच असल्याचे पुन्हा समोर आले आहे. लॉकडाऊनमध्ये नालेसफाई सुरू केली असली, तरी फक्त 35 कि.मी. क्षेत्रातच हे काम झाले आहे. याच भागात गाळ तसेच राडारोडा असल्याने पावसाळ्यात पुराची शक्यता सांगत त्याच भागाची सफाई करण्यात आली आहे.
शहरात दरवर्षी महापालिकेची पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई चर्चेचा विषय असते. मागील वर्षी मुसळधार पावसाने आंबिल ओढा, तसेच नाल्यांच्या परिसरात पूरजन्य स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पालिकेने यंदा दोन महिने आधीच हे काम करण्याचा निर्णय घेतला. मात्र लॉकडाऊन असतानाही आवश्यक बाब म्हणून नालेसफाई सुरूच ठेवण्यात आली. शहरात सुमारे 350 किलोमीटरचे नाले आहेत. मात्र, प्रत्यक्षात 35 किलोमीटरच्या नाल्याच्या ठिकाणी राडारोडा तसेच अतिक्रमणे आणि गाळ असल्याने सफाई केल्याचा दावा करत या क्षेत्रातील 95 टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा ड्रेनेज विभागाने केला आहे.
नागारिकांची निदर्शने
शहरात मागील 3 दिवस मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक भागांत नाल्यांमध्ये पाणी आले होते. लोकप्रतिनिधींनी याबाबत तक्रारी केल्यानंतर शनिवारी आयुक्त शेखर गायकवाड यांनी महापौर, भाजप पदाधिकारी आणि स्थानिक नगरसेवकांसह शहरात नाल्यांची पाहणी केली. मात्र, यावेळी आंबिल ओढ्याच्या कामावरून अनेक भागांत नागरिकांच्या रोषाचा सामना आयुक्त आणि महापौरांनाही करावा लागला. अरण्येश्वर परिसरात नागरिकांनी ओढ्याची सफाई झाली नसल्याचे फलक घेऊन निषेध केला.