पुणे: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अम्फान वादळाने पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्याला दिलेल्या तडाख्यानंतर आता महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांना सुद्धा हवामान विभागाने इशारा दिला आहे. अरबी समुद्रात पुढील 48 तासांमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होत असून या दोन्ही राज्यांच्या किनारपट्टीच्या भागात येत्या तीन जून पर्यत वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. दरम्यान पोषक वातावरणामुळे मान्सून उद्यापर्यत(सोमवारी) केरळात दाखल होईल असा अंदाज ही हवामान खात्याने दिला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात दोन वादळे निर्माण होत आहेत. त्यातील एक वादळ आफ्रिकी किनाऱ्यापासून ओमान आणि येमेनच्या दिशेने जाईल तर दुसरे वादळ भारताजवळ तयार होत आहे. अरबी समुद्रातील आग्नेय-पुर्व-मध्य प्रदेशात येत्या 48 तासात हे कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्याचे रूपांतर वादळात झाल्यानंतर सुमारे 90 ते 100 किलोमीटर वेगाने वारे किनारपट्टीच्या दिशेने वाहणार आहेत त्याचबरोबर त्याची तिव्रता सुद्धा वाढणार आहे. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टीलगत ढगांची दाटी होऊ लागली आहे.
राज्यात सुद्धा आजपासून अनेक भागात पुर्वमोसमी पावसाला सुरूवात झाली आहे. येत्या 48 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हे वादळ तीन जून पर्यत गुजरात आणि उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आदळेल असा अंदाज आहे. मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना वादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. गुजरात किनारपट्टीला त्याचा तडाखा जास्त जाणवेल असा अंदाज आहे.
राज्यातील हवामान बदलण्यास सुरवात झाली असून आज कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागात सोसाट्याचा वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. उद्यापासून(सोमवार) त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कोकण, घाट माथा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातही मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज आहे. दरम्यान या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनचे वारे खेचण्यास पोषक वातावरण तयार होत असल्याने आपल्या नियोजित वेळेनुसार मान्सून केरळात दाखल होईल.