नारायणगाव -जुन्नर मतदारसंघातील माळशेज परिसरात अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचे चित्रीकरण होते. त्यामुळे पर्यटन तालुक्याचा दर्जा मिळालेल्या जुन्नर परिसरात चित्रनगरी प्रकल्प राबवा, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या बैठकीत केली.
लॉकडाऊन शिथिल करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर नाट्य, चित्रपट व मालिका निर्मात्यांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक आयोजित केली होती. चर्चेदरम्यान डॉ.कोल्हे यांनी ही मागणी केली.
डॉ. कोल्हे म्हणाले की, रोजगाराच्या विकेंद्रीकरणाच्या दृष्टिकोनातून मुंबईसह इतर ठिकाणी देखील चित्रिकरण करण्यासाठी चित्रनगरी प्रकल्प राबवता येऊ शकेल. कोल्हापूरप्रमाणेच अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचे चित्रीकरण जुन्नरलगतच्या माळशेज परिसरात होत असते. लॉकडाऊनमुळे संपूर्ण हंगाम बुडाल्याने अडचणीत आलेल्या तमाशा फडमालकांना विनातारण कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
तमाशा व्यवसायाचा हंगाम गुढीपाडव्यापासून सुरू होतो. या काळात यात्रा-उत्सवांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या तमाशा कार्यक्रमातून फंडांचा वर्षभराचा खर्च भागवला जातो. परंतु लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर गावोगावच्या यात्रा-उत्सवांना प्रशासनाने परवानगी नाकारली. त्यामुळे तमाशाचा संपूर्ण हंगाम बुडाला आहे.
परिणामी तमाशाचे फड,त्यात काम करणारे कलावंत त्यांचे कुटुंबीय आदींना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांच्यासमोर उपासमारीचे संकट उभे राहिले आहे, याकडे डॉ. कोल्हे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचे लक्ष वेधले.
आर्थिक अडचणीतील फडमालकांना आधार दिला नाही तर महाराष्ट्राची लोककला धोक्यात येईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. फडमालकांना विनातारण कर्ज देण्याची व्यवस्था करण्याची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठवले आहे.