भोर -नऊ दिवस टम्पोट क्वारंटाइन झोलल्या कुटुंबाची प्रशासनाने अखेर दखल घेतली. त्यांना आत सर्व सोयींसह गावच्या जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाइन करण्यात आले आहे. भोर तालुक्यातील आंगसुळे येथील मुंबईवरुन आलेल्या कुटुंबाला करोनाच्या भीतीपोटी ग्रामस्थांनी गावात येण्यास अटकाव केल्याने हे कुटुंब गावाबाहेर माळरानावर 9 दिवसांपासून त्यांच्याच टेम्पोत क्वारंटाइन झाले होते.
“आंगसुळे गावात माणुसकी हरवली’ या शीर्षकाखाली दैनिक प्रभातने आज बातमी प्रसिद्ध करुन वाचा फोडली होती. या वृत्ताची दखल भोर विधानसभा मतदार संघाचे आमदार संग्राम थोपटे यांनी घेऊन भोरच्या प्रशासनाला या कुटुंबाची तातडीने सोय करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार वीज, पाणी, पंखा आदी सोय करून त्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत क्वारंटाइन केल्याची माहिती गट विकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी दिली.
आमदार थोपटे म्हणाले, महामारीमुळे घबराटीचे वातावरण आहे. ही माहिती थोडी आधीच मिळाली असती तर या कुटुंबाची झालेली गैरसोय वेळीच दूर करता आली असती. खेड्यापाड्यातील लोक उद्योग, धंद्यानिमित्त शहरी भागात जातात. गावच्या विकासात त्यांचा मोठा आर्थिक हातभारही ग्रामस्थांना लाभतो; मात्र आज हेच गावाला हवेहवेसे वाटणारे चाकरमानी करोनाच्या महामारीत नकोसे वाटू लागले आहेत.