पुणे(प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील करोना विषाणूचा वाढता संसर्गाचा आणि विद्यार्थी हिताचा विचार करून पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाची परीक्षासुद्धा न घेता त्यांना ग्रेड देऊन उत्तीर्ण करण्याच्या पर्यायास मान्यता द्यावी, असे पत्र राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाला पाठविले आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाची परीक्षाही रद्द होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
करोनामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षा याचे गांभीर्य लक्षात घेता अकृषी विद्यापीठांमधील पदवीपूर्व व पदव्युत्तरच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी वगळून इतर विद्यार्थ्यांना पुढील वर्षामध्ये प्रवेश देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. या विद्यार्थ्यांना ग्रेड देण्याची कार्यवाही ही विद्यापीठ अनुदान आयोगाच्या तसेच राज्यस्तरीय समितीच्या सूचनांना अनुसरून केली जाणार आहे.
मात्र, सद्यस्थितीमध्ये राज्यात करोना विषाणूंच्या वाढता प्रादुर्भाव पाहता पदवीपूर्व व पदव्युत्तरच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा जुलै महिन्यात घेणे ही बाब कठीण वाटते. कारण करोना विषाणू संसर्गाचा वेग पाहता सामाजिक अंतराबाबत निकषांचे पालन करून महाराष्ट्रातील सुमारे 8 ते 10 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे ही बाब व्यवहार्य ठरणार नाही. तसेच त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात टाकणे संयुक्तिक ठरणार नाही, असेही उच्च शिक्षणमंत्र्यांनी पत्रात नमूद केले आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य याचा विचार करून अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना ग्रेड प्रदान करणे, ह्या पर्यायास मान्यता द्यावी आणि तशा मार्गदर्शन सूचना निर्गमित करण्यात यावी, असेही पत्रात म्हटले आहे.
अन्यथा परीक्षा रद्द करण्याचा निर्णय होणार…
दरम्यान, उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधनाना हे पत्र पाठविण्याची माहिती दिली. त्याबाबत आयोगाकडून सूचना येतील. आयोगाने काहीच मार्गदर्शक सूचना न केल्यास एक-दोन दिवसांत मंत्रालयात बैठक घेण्यात येणार आहे. त्यात अंतिम वर्षाच्या परीक्षेवर ठोस निर्णय राज्य शासनाने घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“राज्य सीईटी सेलकडून जुलै महिन्यात सीईटी घेतले जाणार आहेत. त्याबाबतचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. ही परीक्षा तालुकास्तरावर घेण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना सेंटरही बदलण्याची सुविधा दिली आहे. लॉकडाऊनमुळे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर येता नाही, त्यांनाही वाहनांची सोय केली जाणार असल्याचे उच्च शिक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे.