लखनौ: उत्तर प्रदेशात औरैया येथे दोन ट्रकच्या धडकेने झालेल्या अपघातात 26 स्थलांतरित मजुरांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ही बातमी देशभर चर्चेचा विषय ठरली होती, पण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी या अपघाताबद्दल कॉंग्रेसलाच जबाबदार धरले आहे. मात्र, यासाठी त्यांनी जो तर्क दिला आहे तो मात्र अचंबित करणारा ठरला आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, मजुरांना घेऊन येणारे हे दोन्ही ट्रक कॉंग्रेसशासित राज्यांतूनच आले होते.
एक ट्रक राजस्थानातून आला होता तर दुसरा ट्रक पंजाबातून आला होता. त्यांची टक्कर उत्तर प्रदेशात झाली असली तरी या दोन्ही राज्यांमध्ये कॉंग्रेसचीच सरकारे असल्याने तेच या अपघाताला जबाबदार आहेत. बिहार आणि झारखंडमधून येणाऱ्या स्थलांतरित मजुरांकडून ट्रकचालकांनी मोठी रक्कम उकळली त्यावेळी कॉंग्रेस कोठे होती, असा सवालही त्यांनी केला आहे. आता त्यांना स्थलांतरित मजुरांचा पुळका आला आहे, अशी टिपण्णीही त्यांनी केली.
सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली, अशी कॉंग्रेसची गत झाली असल्याची शेरेबाजीही त्यांनी केली. स्थलांतरित मजुरांची अशी चेष्टा करणाऱ्या कॉंग्रेसचा मी निषेध करतो असे ते म्हणाले. कॉंग्रेसने या प्रकरणात राजकारण न करता स्थलांतरित मजुरांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.