सातारा – करोनामुळे संपूर्ण जग संकटात सापडले आहे. भारतासह महाराष्ट्रात तसेच जिल्ह्यातही करोनाची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर स्टेट बॅंक ऑफ इंडियाने लोकांना गरजेच्या वेळी पैसे उपलब्ध व्हावेत, यासाठी सातारा शहर व परिसरात फिरती एटीएम सेवा सुरू केली आहे. “एटीएम आपल्या दारी’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून एटीएम कार्डधारकांना बॅंकेने दिलासा दिला आहे.
सध्या करोनामुळे सर्वसामान्यांसह सर्वांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. करोनाला थोपविण्यासाठी देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. तसेच करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लोकांनीही घराबाहेर न पडण्याचे आवाहन सरकारकडून वारंवार करण्यात येत आहे.
संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे घराबाहेर पडल्यास कारवाई होत आहे. त्यामुळे गरजेच्या वस्तू घेण्यासाठीही लोकांकडे बॅंक खात्यात पैसे असले तरी ते काढायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकांची ही अडचण लक्षात घेऊन भारतीय स्टेट बॅंकेच्या सातारा क्षेत्रीय कार्यालयाने एक अनोखा उपक्रम राबवला आहे. लोकांची अडचण दूर करण्यासाठी स्टेट बॅंकेने सातारा शहरात फिरते एटीएम सुरु करण्याचा निर्णय घेत त्यांची अंमलबजावणीही केली आहे. शुक्रवारी (दि. 8) या फिरत्या एटीएम सेवेचा शुभारंभ करण्यात आलो.
अशी आहे फिरती एटीएम सेवा
एटीएमचे वाहन ठिकठिकाणी विशिष्ट वेळेत जाऊन लोकांना पैसे मिळावेत, यासाठी स्टेट बॅंकेने वेळेचे नियोजन केले आहे. त्यानुसार बॉम्बे रेस्टॉरंट चौकात सकाळी 9 ते 11, शाहूपुरी चौकात सकाळी 11.15 ते 1.15, फुटका तलाव परिसरात दुपारी 1.30 ते 3.30, एसटी स्टॅण्ड परिसरात दुपारी 3.45 ते 5.45, राजवाडा परिसरात सायंकाळी 6 ते 7 या वेळेत फिरती एटीएम सेवा सुरु राहणार आहे. स्टेट बॅंकेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या या फिरत्या एटीएम सेवेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन क्षेत्रीय प्रबंधक संदीप मून यांनी केले आहे.
स्टेट बॅंकेकडून आता फिरती एटीएम सेवा
करोनाच्या संकटात दिलासा, साताऱ्यात “एटीएम आपल्या दारी’ उपक्रम
====================