गोंदवले – करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत प्रशासन व ग्रामस्थ यांच्यात समन्वय साधण्याचे काम गावोगावचे पोलीस पाटील करत आहेत. मात्र, या परिस्थितीत ग्रामस्थांच्या रोषाला पोलीस पाटील बळी पडत असल्याचे चित्र सर्रास गावांमध्ये आहे. पुण्या, मुंबईसह परगावाहून आलेल्या लोकांच्या माहिती गोळा करण्याचे काम करत असताना अनेकदा पोलीस पाटील आणि ग्रामस्थांमध्ये वादाचे प्रसंग निर्माण होत असल्याने करोना वॉरिअर पोलीस पाटलांना वाली कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने पोलीस पाटलांना खंबीर साथ देण्याची गरज आहे.
माण तालुक्यात 96 महसूली गावांसाठी दहिवडी विभागात 48 तर म्हसवड विभागात 39 पोलीस पाटील कार्यरत आहेत. पोलिसांचे गावागावातील डोळे अन् कान म्हणून पोलीस पाटलांकडे पाहिले जाते. एक रुपयाही कोणाला न देता फक्त गुणवत्तेवर नवीन भरती झालेले सर्वच पोलीस पाटील अतिशय कार्यक्षम असे आहेत. गावागावात या पोलीस पाटलांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचे पोलिसांना चांगले सहकार्य लाभत आहेत.
सध्या कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीतही पोलीस पाटील मोलाची भूमिका बजावत आहेत. प्रशासनाने तयार केलेल्या स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीत सरपंच, उपसरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांचा सहभाग आहे. अपवाद वगळता तलाठी गावांकडे फिरकताना दिसत नाहीत. तर ग्रामसेवकही पाट्या टाकण्यावर समाधान मानत आहेत. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन समितीत खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणे काम कोण करत असेल तर ते आहेत पोलीस पाटील.
गावात नवीन कोण आलंय, बाहेरुन कोण येतंय, गावात चुकीच्या गोष्टी कुठे सुरु आहेत, गावात नियमांचं पालन सुरु आहे की नाही, यासह विविध बाबींकडे पोलीस पाटील कटाक्षाने लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ, चाकरमानी तसेच राजकारणी यांच्या रोषाला पोलीस पाटलांना बळी पडावे लागत आहे. अनेक ठिकाणी पोलीस पाटलांना बघून घेण्याची भाषा वापरली जात आहे तर काही ठिकाणी पोलीस पाटलांना शिवीगाळ व मारहाणही झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे पोलीस पाटलांच्या मनोधैर्यावर परिणाम होत आहे. करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवायचे असेल तर पोलीस पाटलांना प्रशासनाकडून साथ व पाठबळ मिळण्याची आवश्यकता आहे.
माण तालुक्यात गावोगावचे पोलीस पाटील उत्कृष्ठ काम करत आहेत. त्यामुळे पोलीस पाटील यांच्यासह अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांच्याशी गैरवर्तन, शिवीगाळ अथवा त्यांच्यावर हात उचलणाऱ्यांची गय केली जाणार नाही. अशा गावगुंडांवर सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल कडक कारवाई करुन कठोर शासन करण्यात येईल.
राजकुमार भुजबळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक, दहिवडी.